मोबाइल कंपन्यांची सरकारकडे मागणी
नवी दिल्ली – सरहद्दीवरील संघर्षामुळे केंद्र सरकार मोबाइल कंपन्यांना चिनी उपकरणे टाळावीत, असा सल्ला देण्याची शक्यता आहे. मात्र, सीओएआय या मोबाइल कंपन्यांच्या संघटनेने म्हटले आहे की, आम्हाला व्यावसायिक पातळीवर निर्णय घेण्याची परवानगी असावी.
सरहद्दीवरील संघर्ष व राजकीय परिस्थितीच्या आधारावर जागतिकीकरणाच्या काळात असे निर्णय घेणे बरोबर नाही. मात्र, जर केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाच तर आम्ही त्याची अंमलबजावणी करू. नियमित परिस्थितीत गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे हित ध्यानात घेऊन कंपन्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे सेवा कार्यक्षम आणि किफायतशीर दरात उपलब्ध करण्यात मदत होत असते, असे या संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यू यांनी म्हटले.
आतापर्यंत तरी आम्हाला सरकारने चिनी उपकरणे टाळावीत, असे सांगितलेले नाही. मात्र, सरकारने जर असे स्पष्ट सांगितले तर आम्ही सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करू. त्याचा सेवाच्या किफायतशीरतेवर परिणाम होऊ शकतो.