पिंपरी – वेगाने वाढणारे आणि पसरणारे पिंपरी चिंचवड शहर आणि त्यामधील घटणारी देशी वृक्षांची संख्या सध्या पर्यावरण प्रेमीसाठी चिंतेचा विषय असून प्रत्येक वर्षी शहरात लाखो रोपे लावली जातात. त्यात विदेशी वृक्षांची भर अधिक पडत आहे. थोडा पाऊस झाल्यावर ती सहजरित्या पडत आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून विविध कारणांनी तोडलेले वृक्षांच्या जागी देशी रोपे लावण्याची गरज आहे. तसेच विदेशी वृक्षांचा पर्यावरणासाठी, पक्ष्यांसाठी कोणताही उपयोग नसल्याने तज्ज्ञ सांगतात. विदेशी वृक्षांवर पक्षी देखील आपली घरटी बनवित नाहीत. तरीदेखील शहरात यांची संख्या वाढताना दिसत आहे.
रस्ता रुंदीकरण, मेट्रो आणि इतर विविध विकास कामांसाठी शहरातील हरित पट्टे अर्थात झाडे तोडण्यात आली. काही झाडांचे पुनर्रोपण केले. मात्र, आत त्यावरही कुऱ्हाड पडताना दिसत आहे. वृक्षतोडीमुळे शहरातील तापमान पुण्याच्या तापमानापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तापमानात 3 ते 4 अंशाचा फरक जाणवत आहे. त्यामुळे शहराचे वाढते तापमान कमी करण्यासाठी देशी वृक्षांची गरज आहे. शहराच्या वृक्षसंपदेमध्ये गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष, अकेशिया यासारख्या भरपूर वाढ झालेल्या अनेक विदेशी वृक्षांची वाढती संख्या हा सध्या शहरी पर्यावरणासाठी संवेदनशील विषय आहे. शहराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी देशी वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याची गरज आहे.
झटपट वाढणारे विदेशी वृक्ष
या वृक्षांना आपल्याकडील तिन्हीही ऋतुमध्ये उपलब्ध असणारे वातावरण पोषक असल्यामुळे त्यांची वेगाने वाढ होते. वाढताना त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल जाण्याऐवजी पृष्ठभागालागतच पसरतात. पावसाळ्यात या वृक्षाखाली उभे राहणे धोक्याचे असते. वादळ वारे आणि पाऊस यांना सामोरे जाताना फांद्यामध्ये लवचिकपणा कमी असल्यामुळे त्या सहज तुटतात. गेल्या काही वर्षांत या वृक्षांच्या उन्मळण्यामुळे अनेक अपघात व प्राणहानी झाली आहे. ऑगस्टमध्ये नाशिकफाटा येथे वृक्ष पडून दोघांना दुखापत झाली होती. त्यासोबतच देशी वृक्षांच्या तुलनेत विदेशी वृक्षांचे फायदे खूपच कमी आहेत.
पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी लागवडीसाठी दीड लाख रोपे तयार आहेत. जून जुलैमध्ये ती शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
– गोरख गोसावी, मुख्य उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग
वर्षभरात 79 झाडे पडली
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यासाठी दीड लाख रोपे नर्सरीमध्ये तयार आहेत. मात्र, शहरात सध्या ठिकठिकाणी विदेशी वृक्षांची लागवड होत आहे. त्यामुळे किरकोळ वारा-वादळ आल्यास ती पडून नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात गेल्या वर्षभरता 79 झाडे पडली. तर, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात 16 झाडे पडल्याची नोंद अग्निशमन दालाकडे आहे. तर, मागच्या वर्षी या तीनही महिन्यात एकही झाड पडले नाही. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सुमारे 77 झाडे पडली. तर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात प्रत्येकी एक झाड पडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे आहे.
लागवडीसाठीची रोपे
महापालिकेच्या निगडी प्राधिकरणातील सेक्टर 27 मध्ये रोपवाटिका आहे. तेथे वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, कदंब, सोनचाफा, बकुळ, पेल्टोफोरम, मोहगणी, अर्जुन, आकाशनिम, फणस, जारुळ, टबोबिया, शिरस, जांभूळ, सिल्वर ओक, खाया, पिंपर्णी, जॅकरांडा, बीक्सा, पारिजातक, टर्मेलिया, बेल, बदाम, अशोक, कॅशिया, शिवण, सिताअशोक, केलासपती, बॉटलब्रश, कोनोकार्पस ही रोपे लागवडीसाठी दीड लाख रोपे तयार
केली आहेत.