नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसून येत आहे. दररोज तालुक्यात कुठे ना कुठे बिबट्याचे घटना घडलेली ऐकायला येते. सोमवारी (दि. 8) पहाटे तीन वाजेच्या सुमारास आनंदवाडीतील शुभम विश्व सोसायटीच्या पाठीमागे तुकाराम दगडू निंबाळकर यांच्या घरासमोरील शेळ्यांच्या कळपाच्या शेडला जाळी असूनही जाळीतून पाय घालून एका करडूला गंभीर जखमी केले आहे.
बिबट्याला करडू बाहेर काढता न आल्यामुळे तेथून निघून गेला अशी माहिती विवेक निंबाळकर यांनी वारूळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ,वनविभाग कर्मचारी वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ यांना दिली. लवकरच पंचनामा करून योग्य मदत मिळवून दिली जाणार आहे.
याच दिवशी वारुळवाडीतील चिमणवाडी येथे जयराम वाव्हळ यांच्या घरासमोरील पाळीव कुत्रे सकाळी सात वाजता बिबट्याने झडप मारून उसाच्या शेतात ओढून नेल्याची घटना घडली तर घराजवळच असणार्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून शेळीला गंभीररित्या जखमी केले आहे.
आजूबाजूला उसाचे क्षेत्र असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात पाणी भरणे व इतर मशागतीची कामे करत असतात. शेतकर्यांनी शेळ्यांची व जनावरांची योग्य काळजी घेणे आद्य कर्तव्य आहे असे वनविभागाच्या अधिकार्यांनी म्हटले आहे. लवकरच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात येणार आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली आहे.