पुणे – खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करा. नवीन मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात कालवा समितीची बैठक पार पडली. त्यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते. खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा 2.5 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.
पवार म्हणाले, शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी. सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.
भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी पाईपलाईन, पंपींग स्टेशन आदी कामे गतीने पूर्ण करावीत, जेणेकरुन खडकवासला प्रकल्पावरील तेवढा ताण कमी होईल. महानगरपालिकेने 100 टक्के पाणी मीटर बसवणे, बेकायदेशीर नळजोड तोडण्यासह त्यावर कठोर कारवाई करणे यावर विशेष भर द्यावा. दक्षिण तसेच पूर्व पुणे भागात पाण्याच्या अडचणींबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घ्यावीत तसेच सुरू असलेली कामे गतीने आणि चांगला दर्जा राखून पूर्ण करावीत.
राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नुकतीच 24 हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे. भविष्यातही ही मागणी वाढण्याची शक्यता असून अतिरिक्त वीज उपलब्ध करुन घेण्यासाठी एनटीपीसीकडून तसेच नॅशनल ग्रीडमधून वीज घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, भविष्यातही वीजेच्या समस्येला गृहीत धरुन पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री
लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. काही अधिकारी पाणी सोडणाऱ्यांवर दबाव आणून पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात सोडत आहे. हे दबावतंत्र नक्की टॅंकर लॉबीसाठी, की अन्य कोणासाठी? रविवारी सायंकाळी 4 वाजता आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन तेथे किती दाबाने पाणी येते, हे आम्ही पाहणार आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही आज मुद्दे मांडले. त्यावेळी केवळ सुधारण करतो, असे उत्तर मिळते. मात्र, जीव गेल्यावर सुधारणा करणार का? तीन दिवसांत पाणीपुरवठा सुधारला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याचे नेतृत्व मी करेल.
– गिरीश बापट, खासदार.