गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे – विरोधकांकडून नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन केली जात आहे. मात्र, आम्ही पारदर्शकपणे काम करतोय आणि भविष्यातही पारदर्शकपणेच काम करत राहणार, असा विश्वास देत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेत पेनड्राइव्ह, सीडीचा आधार घेत सरकारवर आरोप केले आहेत. त्याचा परिणाम सरकारची प्रतिमेवर कितपत होईल, या प्रश्नावर वळसेपाटील म्हणाले, “खोटे-नाटे आरोप करायचे, केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करत, नाही त्याच्याशी संबंध जोडायचे, एकीकडे कायदा सुव्यवस्था अडचणी आहे असे म्हणणार आणि दुसरीकडे छोट्या-छोट्या गोष्टीवरून मोठे मोर्चे काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा.
ही विरोधकांची नवीन पद्धत आहे. मात्र, असल्या कारस्थानांनी सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही. प्रवीण चव्हाण प्रकरणाची चौकशी सीबीआयडे वर्ग करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत विचारले असता, त्याला मी एवढे महत्त्व देत नसल्याचे सांगत, स्थानिक पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील, असे वळसेपाटील यांनी सांगितले.
पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या घटना या दुर्दैवी आहेत. या घटना जवळचे नातेवाईक किंवा ओळखीतून झाले असून, ही चिंतेची बाब आहे. त्याबाबत संबंधित आरोपींना तत्काळ अटक करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत, याबाबत पोलिसांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
– दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री