केंद्रीय राज्यमंत्री, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी
राज ठाकरेंना उद्योग नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या काही उद्योग नाही आणि विरोधक गलितगात्र झालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देश फिरण्यापेक्षा महाराष्ट्रात राहून पक्षवाढीवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला आठवले यांनी दिला.
पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने 22 जागांचा प्रस्ताव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. तरी पिंपरी आणि कॅन्टोन्मेंटसह किमान 10 जागा द्याव्यात, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी नवीन विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, “लोकसभेला वंचित आघाडी काही जागांवर त्यांना मताधिक्य मिळाले असले, तरी आता त्यांच्यात फूट पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित आघाडीची चिंता नाही. वंचितमधील लोक आमच्याकडे येत आहेत.’ “तिहेरी तलाकवरून कॉंग्रेसने घेतलेली भूमिका योग्य नाही. ईव्हीएम कॉंग्रेसनेच आणले. आज मात्र ते विरोध करत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली, तरी आम्हीच जिंकून येऊ, असे आठवले म्हणाले. सध्या राष्ट्रवादीचे घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांच्या पुढे जात नाही, तर कॉंग्रेसचा हात हलत नसल्याचा टोला आठवले यांनी लगावला.