सातारा – कण्हेर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला कण्हेर गावानजिक मोठी गळती लागली असून ही गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. परिणामी शाहूपुरीत होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे.
कण्हेर पाणी योजनेतून शाहूपुरीकरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यापासून जलवाहिनी फुटण्याचे प्रकार अनेकदा होत आहे. परिणामी शाहूपुरीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कण्हेर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कण्हेरनजिक गुरुवारी गळती लागली आहे. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेले. गळती काढण्याचे काम त्वरीत हाती घेण्यात आले असले तरी गुरुवारी दुपारच्या सत्रातील तसेच शुक्रवारी पूर्ण भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. जलवाहिनीची गळती तात्काळ काढण्याबाबत शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्यावतीने संबंधिताकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.