सातारा (प्रतिनिधी) – करोनाच्या अनुषंगाने सुरू असलेला पोलीस बंदोबस्त अन् त्यांचे काम चांगले असले तरी पोलीस त्यांच्या मूळ कायदा व सुव्यस्था या कामाकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. एकाच महिन्यात तीन खून, पोलिसाला झालेली मारहाण या सगळ्यामुळे साताऱ्यात गुन्हेगारांचे मनोबल वाढून कायदा व सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे.
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या रक्ताचे डाग पुसण्याअगोदरच पोलीस ठाण्यातच खूनाची घटना घडल्याने पोलिसांच्या कामगिरीवरच डाग पडल्याने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांआधी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत दारूच्या नशेत एकाचा खून झाला होता. त्याच्या तपास सुरू असतानाच देगाव निगडी रस्त्यावर एकाचा खून करून मृतदेह टाकल्याची घटना घडली. त्याचा तपास पोलिसांना अद्याप लागला नसतानाच पोलीस ठाण्यातच खुनाची घटना घडली. शुक्रवारी तर शहरातील विसावा नाका परिसरात कोयता गॅंगने धुडगूस माजवत दिवसाढवळ्या साताऱ्यातील पोलिसिंगलाच आव्हान दिले आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटना पाहिल्या की समाजात पोलिसांबाबत असलेला विश्वास कमी होताना दिसत आहे.
महामार्गालगत झालेला खून हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिस सांगत आहेत. देगाव निगडी रस्त्यावरील खुनाचे कारण व मृताची ओळख अद्याप पोलिसांना पटलेली नाही. पोलीस ठाण्यात झालेला खून बदल्याच्या भावनेतून घडल्याची चर्चा आहे. खुनांनी हादरलेली राजधानी हाफ मर्डर घरफोड्या, राजवाड्यावर पोलिसाच्या गणवेशाला घातलेला हात, दुचाकी चोऱ्या, किरकोळ मारामाऱ्या, विनयभंग, दरोडा या सगळ्यांनी पुरती घायाळ झाली असल्याचे चित्र आहे. मात्र, पोलिस केवळ कायम तपासावर असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत.
जिल्ह्यात घडत असलेले गुन्हे व उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पोलिसांना त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. घरफोड्यांच्या गुन्ह्यात केवळ आकड्यांचा खेळ करण्यासाठी अटक संशयितांची संख्या वाढवण्यापेक्षा खऱ्या गुन्हेगारांना शोधून मुद्देमाल रिकव्हरीचा रेट वाढवण्याची गरज आहे. असे केले तरच गुन्हेगारांना जरब बसेल अन् पीडितांचा चोरीला गेलेला माल त्यांना मिळेल. नाहीतर नुसते अटकेचे आकडे वाढवून तक्रारदाराचा पदर फाटकाच राहणार असेल तर त्या शिताफीने पकडलेल्या संशयितांना अन् सापळ्यांना काहीच अर्थ उरणार नाही. दारूची अवैध विक्री, मटका, जुगार, गुटखा या आता नित्याच्या बाबी झाल्याने पोलीस त्याला काहीच करू शकत नसल्याची भावना लोकांच्या मनात रुजली आहे.
वाळूचा उपसा व वाहतूक तर शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. अशा प्रकरणात वाळू चोरानांच पाठीशी घातले जात असल्याचे वास्तव आहे. रामराज्याचा नुसता फलक लावून रामराज्य असल्याचे लोकांना वाटत नाही तर ती भावना लोकांच्या मनात निर्माण व्हावी लागेल अन्यथा पोलीस नावाच्या यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास उडायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे गृह राज्यमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मनाला बरे वाटणारे आकडे बाजूला सारून जनतेला खरे व आधार वाटणाऱ्या आकड्यांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.