अतुल बेनके ः जुन्नर तालुक्यात अतिपावसाचा पिकांना फटका
ओतूर- जुन्नर तालुक्यात प्रशासकीय पातळीवरून अतिपावसाचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला आहे, त्यांच्याबाबत तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश आमदार अतुल बेनके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्याचा अहवाल चार दिवसात तहसीलदार कार्यालयास सादर करण्याचे आदेशही तहसीलदारांनी विद्यमान खासदार व आमदारांच्या सूचनेवरून दिले आहेत, अहवाल प्राप्त होताच नवीन सरकारकडे यासंदर्भात आवाज उठवण्यात येणार आहे. सरकारी आदेशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, या कामी पाठपुरावा करण्याचे काम दिल्लीत खासदार अमोल कोल्हे, तर मुंबईतून आमदार अतुल बेनके करणार आहेत.
जुन्नर तालुक्यात परतीच्या अतिपावसाने रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमुग, कांदा रोप आणि कांदा आदी पिके भुईसपाट होत आहेत. शेतात तुडुंब पाणी असून, या भागात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
या भागातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत तर शेतात तुडुंब पाणी भरले शेतीचे झालेले नुकसान पंचनामे करून भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी जुन्नर तालुक्याचे खासदार अमोल कोल्हे आणि नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके यांनी सर्व सत्कार कार्यक्रमांना बगल देत संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसह केली. गेल्या पंधरा दिवसापासून पडणारा परतीचा अतिपाऊस आणि सतत ढगाळ वातावरण यांमुळे काढणीस आलेल्या आणि शेतामध्ये काढून ठेवलेल्या सोयाबीन, भुईमूग, भात, भाजीपाला आणि ऑक्टोबर छाटणीच्या द्राक्ष पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. या सर्व गोष्टींचा अंदाज घेत आमदार अतुल बेनके यांनी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला असून, अधिकाऱ्यांना पंचनाम्यांबाबत आदेश दिले आहेत.