नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा प्रारंभ केला. आपल्या गावांना सक्षम बनवणे आणि 21 व्या शतकात भारताला आत्मनिर्भर बनवणे हा आज सुरू करण्यात आलेल्या या सर्व योजनामागील हेतू आहे.
मत्स्यसंपदा योजनाही याच हेतूने सुरू केली जात आहे. देशातील 21 राज्यांत 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ही योजना सुरू करण्यात येत असून येत्या 4-5 वर्षांत हा खर्च केला जाईल. त्यापैकी 1700 कोटी रुपयांचे प्रकल्प आज सुरू केले जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे 2024-25 पर्यंत देशाच्या मत्स्य उत्पादनात 70 लाख टनांची अतिरिक्त वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेत नवीन पायाभूत सुविधा, आधुनिक उपकरणे आणि मासे उत्पादकांना नवीन बाजारपेठ तसेच शेती व इतर माध्यमांद्वारे वाढीव संधी मिळवून देण्याची तरतूद आहे.
पंतप्रधानांनी प्रत्येक घरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बिहार सरकारने केलेल्या कामांचे कौतुक केले. 4-5 वर्षांत बिहारमधील केवळ 2 टक्के घरे पाणीपुरवठा जोडणीशी जोडलेली होती आणि आता बिहारमधील 70 टक्क्यांहून अधिक घरांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. पंतप्रधान म्हणाले की, बिहार सरकारच्या प्रयत्नांमुळे आता केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनला आणखी सहकार्य मिळत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ई-गोपाला या ऍपचे देखील उद्घाटन केले. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना प्रजाती सुधारणांसह, बाजारपेठची उपलब्धता आणि इतर माहिती मिळू शकेल. याबरोबरच आज बिहारमधील मत्स्यपालन उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीमधील अभ्यास आणि संशोधनाशी निगडित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.