लातूर – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले आहेत. या मागे काही तरी काळेबेरे असावे अशी शंका त्या पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केली असून त्यासंबंधात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे सादर केले आहे.
राज्यपालांना भेटलेल्या भाजपच्या शिष्टमंडळामध्ये आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार अभिमन्यु पवार, यांचाही समावेश होता. काल शुक्रवारी मुंबईत राजभवनावर या शिष्टमंडळाने भेट देऊन राज्यपालांकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
या निवेदनात भाजपच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे की, निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आमचे अर्ज बाद करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. विरोधकांचे उमेदवारी अर्जच बाद करून कॉंग्रेसने या बॅंकेवरील लोकशाही प्रक्रियेचीच हत्या केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.