अधिकाऱ्यांनी केली आंदोलकांशी चर्चा : जलसंपदामंत्र्यांची घेणार भेट
अकोले – घाटघर आंदोलकांनी “जलसमाधी’ आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. दोन महिन्यांत यात मार्ग न निघाल्यास आंदोलनाची दिशा बदलावी लागेल, असा इशारा देविदास खडके यांनी दिला आहे. उद्या (दि.3) जलसंपदामंत्र्यांशी आंदोलकांची भेट घडवून आणली जाईल, असे जि. प.चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे म्हणाले.
आमच्या प्रकल्पात जमिनी गेल्या आहेत. शासनाने आमच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी केल्या आहेत आणि आता त्याच जमिनी आम्हाला अव्वाच्या सव्वा दरामध्ये आमच्या माथी मारल्या आहेत. आमचे आदर्श पुनर्वसन करण्याच्या नावाखाली आमची घोर फसवणूक झाली आहे. आमच्या मागण्या दोन महिन्यांच्या आत शासनाने पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा या आंदोलनाला तीव्र गती देऊ, असे घाटघर येथे प्रकल्पबाधित आदिवासी शेतकऱ्यांचे प्रमुख देविदास खडके यांनी म्हटले आहे. रविवारी (दि.1) दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे व किरण लहामटे यांच्या मध्यस्थीनंतर बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तात्पुरते माघारी घेण्यात आले.
अकोले तालुक्यातील घाटघर येथे गेल्या चार दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी घाटघर जलविद्युुत प्रकल्पात जमिनी गेलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचे धरणावरच रात्रंदिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. हे आंदोलन आदिवासी बांधवांचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे व किरण लहामटे यांनी मध्यस्थी केल्यानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले असले, तरी दोन महिन्यांत जर शासनाने आमची दखल घेतली नाही, तर आंदोलन आणखी जोमाने सुरु करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास रविवारी आदिवासी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अकोले तहसीलदार मुकेश कांबळे, ठाणे येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, तसेच घाटघर जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता किरण रोटे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावर आंदोलकांनी झालेला अन्यायाची व्यथा अधिकारी वर्गासंमोर मांडली.
अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांनीही आंदोलकांना लवकरच न्याय मिळण्यासाठी त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. महाजन यांनीही आम्ही लवकरच दावा निकाली काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. घाटघर येथील धरणे आंदोलनाला राजकीय क्षेत्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, तसेच डॉ. किरण लहामटे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, सतीश भांगरे यांचीही साथ मिळाली. आंदोलनात देविदास खडके, लक्ष्मण गांगड, लक्ष्मण पोकळे, पांडू सोंगाळ धोंडिबा सोंगाळ, एकनाथ खडके, सोमा केव्हारी, धोंडू खडके, ताईबाई पोकळे, विठाबाई गांगड, मंदा सोंगाळ, सुंदराबाई पोकळे यांच्यासह घाटघर येथील प्रत्येक घरातील सदस्याने सहभाग नोंदविला.