पुणे – कर्करोग हे भारतातील मृत्यूसाठी कारणीभूत असणारा एक प्रमुख आजार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन ऍन्ड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे 11,57,294 रुग्ण नोंदविले जात असून, 22.5 लाख रुग्ण या आजारासह जगत आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 लाख 84 हजार 821 आहे, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
4 फेब्रुवारी जा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तज्ज्ञांशी चर्चा केली असता, पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, आतड्याचा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येतो. तर महिलांमध्ये स्तनांचा, ओठांचा किंवा तोंडाच्या, गर्भाशयाच्या, फुफ्फुसाच्या आणि जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट आणि राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध व संशोधन संस्था यांनी 2019 प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 0.1 टक्के पुरुषांना व 9.425 स्त्रियांना वयाची 75 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच कर्करोग होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे 7.34 टक्के पुरुष आणि 6.28 टक्के स्त्रिया या प्राणघातक आजारामुळे मृत्युमुखी पडू शकतात.
याबाबत अधिक माहिती देताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. शोना नाग म्हणाल्या, कर्करोगाबाबत जागरूकता वाढविणे, जोखमीचे घटक कमी करणे, कर्करोगाच्या सेवांमध्ये समानता आणि शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम लक्षात घेऊन कर्करोग ग्रस्तांची योग्य ती काळजी घेणे यांचा समावेश होतो. एका बाजूला तंत्रज्ञानाची व कर्करोगतज्ञांची वाढती उपलब्धता आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने परिणामांमध्ये सुधारणा दिसून येत आहेत. लक्ष्यित (टार्गेटेड)थेरपी, इम्युनो थेरपी आणि नवीन उपचारांमुळे आपण वैयक्तिक गरजांनुसार उपचारांकडे वाटचाल करीत आहोत. परंतु दुसरीकडे आरोग्य सेवा आणि संबंधित आर्थिक क्षमतेच्या बाबतीत शहरे आणि ग्रामीण भाग या दोन्हींमध्ये असमानतेचे मोठे आव्हान आहे.
आजाराबद्दल जागरूकता आवश्यक
लेप्रोस्कोपिक आणि आँकोसर्जन डॉ. के. के. जाधव म्हणाले, भारतात लाखो लोक फुफ्फुसे, मुख, स्तन, जठर, गर्भाशयमुख, यकृत, प्रोस्टेट आणि रक्ताच्या कर्करोगाने ग्रासलेले आहेत. त्यामध्ये त्वचा, मूत्राशय आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्णही आढळतात. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण भारतात खूप आहे. आनुवंशिक बाबी, हार्मोन्सचा असमतोल, अनारोग्यकारक जीवनशैली, कमकुवत रोगप्रतिकार यंत्रणा, निदानास होणारा विलंब आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यामुळे कर्करोगाच्या विविध प्रकारांना आमंत्रण मिळू शकते. या प्राणघातक आजाराबद्दल जागरूकता नसल्यामुळे हे घडून येते. कर्करोगावरील उपचार, लक्षणे, निदान व प्रतिबंध याबाबत सर्वांना शिक्षण देणे.
नियमित चाचण्या व तपासण्यांची माहिती देणे. मुलांच्या अभ्यासक्रमांमध्ये कर्करोगाच्या घातक परिणामांची माहिती समाविष्ट करणे. शिबिरे, अभियाने व उपक्रमांचे आयोजन करणे तसेच कर्करोगाबद्दलचे गैरसमज नाहीसे करणे ही काळाची गरज आहे.