कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर पोलिसांनी शुक्रवारी राज्यभरात छापे टाकले. त्या कारवाईवेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका गावात काही दिवसांपूर्वी जमावाने पेट्रोल बॉम्ब टाकून काही घरांची जाळपोळ केली. त्या हिंसाचारात 8 जण मृत्युमुखी पडले. त्या घटनेमुळे मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर, ममतांनी गुरूवारी संबंधित गावाला भेट दिली.
त्यावेळी त्यांनी पोलिसांना अवैध शस्त्रास्त्रे आणि बॉम्ब जप्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याचा आदेश दिला. त्या आदेशाचे तातडीने पालन करत पोलिसांनी राज्यव्यापी छापासत्र राबवले. संबंधित कारवाईवेळी हाती आलेली शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. तर, बॉम्बनाशक पथकांनी गावठी बॉम्ब निकामी केले. शस्त्रास्त्रे आणि बॉम्बचे अवैध साठे करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटक केल्याचे समजते. आणखी काही दिवस पोलिसांची मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे.