पुणे – दस्त नोंदणीवेळी सात-बारा उताऱ्यावरील सर्व खातेदारांचे मोबाइल नंबर आणि ई-मेलआयडी माहिती “आय-सरिता’ प्रणालीमध्ये पब्लिक डेटा एन्ट्री (पीडीई) नोंदविण्याची सुविधा भूमि अभिलेख आणि नोंदणी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारसनोंद, बोजा आदींबाबत होणाऱ्या नोंदीची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसेच जमिनीचे परस्पर होणाऱ्या व्यवहारांमुळे जमीन मालकाची फसवणूक रोखणे शक्य होणार आहे.
मागील काही वर्षांपासून जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे जमीन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बोगस व्यक्तीला उभे करून जमिनीचे दस्त केल्याचे प्रकार घडतात. दस्त नोंदणी होऊन सात-बारा उताऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचे आल्यानंतर जमीन मालकाला फसवणूक झाल्याचे कळते. त्याचबरोबर सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविणे, परस्पर गहाण खत करणे आदी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले. असे प्रकार टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीची माहिती संबंधित जमीन मालकाला समजण्यासाठी महसूल विभागाने ही सुविधा दिली आहे.
त्यानुसार संबंधित सातबारा उताऱ्यावरील सर्व खातेदारांचा मोबाईल क्रमांकाची माहिती दस्त नोंदणी पीडीईमध्ये नोंदविली जाते. या माहितीच्या आधारे दस्त नोंदणी झाल्यानंतर इंडेक्स 2 तयार झाल्यावर तलाठ्याकडे हा दस्त नोंदवित या फेरफार नोटीसची माहिती या सर्व खातेदारांना एसएमएसच्या आधारे दिली जाते. जर सातबारा उताऱ्यावरील एखाद्या खातेदाराची हरकत असेल तर तो तलाठी
अथवा मंडल अधिकारी यांच्याकडे देऊ शकतो. अनेक वेळा दस्त नोंदणी वेळी “पीडीई’मध्ये फक्त जमीन खरेदी करणारा आणि विक्री करणारे यांचेच मोबाइल नंबर दिले जातात.
तर मात्र इतर खातेदारांचे मोबाइल नंबर न देणे, अथवा दुसऱ्या व्यक्तीचे देणे किंवा चुकीचा मोबाइल नंबर टाकणे आदी प्रकार होत आहेत. त्यामुळे सुविधेचा वापर योग्य पद्धतीने झाल्यास संबंधित सात-बारा उताऱ्यावरील खरेदी-विक्री तसेच इतर व्यवहारांची सर्व खातेदारांना माहिती मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आली.
सात-बारा उताऱ्याशी मोबाइल क्रमांक व ई मेल आयडी लिंक करण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. परंतू अनेकदा दस्तनोंदणीपूर्वी पब्लिक डेटा एन्ट्री करताना खरेदीदार अथवा विक्रीदार दोघेही स्वत:चा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी देत नाही. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावरील प्रत्येक बदलाची माहिती एसएमएसच्या माध्यमातून मिळण्यापासून खातेदार वंचित राहतात. या सुविधेचा लाभ खरेदीधारकांनी घ्यावा. – सरिता नरके, अतिरिक्त जिल्हाधिकारी, भूमि अभिलेख विभाग
नोटीसची माहिती मोबाइलवर…
एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी करण्याचा दस्त नोंदविल्यानंतर तो दस्त तलाठी कार्यालयाकडे आल्यानंतर तलाठी सात-बारा उताऱ्यावरील इतर खातेदारांना नोटीस बजावतात. पोस्टाद्वारे नोटीस पाठविण्यात येत असल्याने नोटीस मिळण्यास कधी-कधी उशीर होतो. एखादा व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यात अथवा परदेशात राहत असल्यास त्या व्यक्तीला नोटीस वेळेत पोहचत नाही. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.