पुणे, दि. 8 -पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्यानंतर आता या रेल्वे प्रकल्पाचा सुधारित अहवाल तयार करून पुन्हा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला आहे. दरम्यान, हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता पुन्हा राज्य सरकारने भूसंपादन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पाने गती घेतली होती. भूसंपादन प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. दरम्यान, या प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याने अथवा रद्द होणार असल्याने यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता. त्यानंतर मागील आठवड्यात या प्रकल्पासाठी पुन्हा भूसंपादन करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रकल्पाविषयी…
पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार ताल ुक्यांतून रेल्व ेमार्गासाठी 575 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाकडून यापूर्वी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे. भूसंपादनासाठी 1300 ते 1500 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जात आहे. आतापर्यंत 20 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे संपादन झाले आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये…
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग 235 किलोमीटर
मार्ग पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून जाणार
रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तासांवर येणार
मार्गावर 24 स्थानकांची आखणी