पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनलमुळे पुढील पाच ते सहा वर्षांची चिंता मिटली आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता पुरंदर येथे नवीन विमानतळ व कार्गो सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नवीन विमानतळामुळे जीडीपीमध्ये दोन टक्के वाढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. पुण्याचे सध्याचे विमानतळ हे वायुसेनेचे केंद्र असल्याने येथील धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.
यासाठीच्या सर्व मंजुरी मिळाल्या असून, आधीच्या सरकारने या ठिकाणी विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अडचणी आल्या. मात्र, आता अंतिम निर्णय झाला असून, त्यासाठी लवकरच भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसीत करता येईल. यातून रोजगाराला चालना मिळेल, असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल.