अरुणा सरनाईक
मन म्हणजे नेमकं काय? ते कसं असतं? ते असं का असतं? या प्रश्नांची उत्तर आपण शोधू लागतो. मनाला काही आकार नाही, रूपं नाही. मन आपल्यापासून वेगळं नाही. ते आपणच आपले असतो. आपल्यातून बाहेर पडायचं आणि स्वत:ला निरखायचं की ते सापडतं.
कसं असतं मनाचं! त्याचं ऐकावं तर ते आपलंच लावतं, आपल्याला दादं देत नाही. बरं खूश तरी राहतं का? ते पण नाही. सारखं मला असं वाटतं, माझ्या मनात असं आहे, की हे करावं, ते करावं असं सारखं तुणतुणं लावत राहतं. संत सांगतात आपल्या मनाला आवरा, मनाला सावरा. ते आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका. मनाला आवरण्याचे नाना प्रकार त्यांनी सामान्यांना सांगितलेले आहेत. पण मन फार चलाख! त्याच्या पाठीवर राजा विक्रमादित्यांचा वेताळ स्वार आहे. तो वेताळ जसं सांगेल त्यानुसार ते वागतं! मग ते आपल्याला देखील नाचवतं आणि आपलं डोबाऱ्याचं माकड बनवतं. आयुष्यभर हवं तसं फिरवतं राहतं. समजतं पण आपण स्वत:ला आवरू शकतं नाही.
कसं असतं मन! पावसाच्या धारेसारखं की दाटून आलेल्या मेघासारखं! प्रखर सूर्यप्रकाशासारखं! लख्ख झळझळीत तेजस्वी आतबाहेर काहीही नसल्यासारखं! पारदर्शी आरसपानी! आपल्याच चुका आपल्यालाच स्वच्छपणानं दाखवणारं की गुणगुणत्या गाण्यासारखं! मला वाटतं मन एखाद्या गावासारखं असावं! तसंही प्रत्येकाचं मन एका गावासारखं असतं.
किंबहुना राज्यासारखं आणि आपण त्या गावाचे, राज्याचे राजे असतो. खरं सांगू, राजा तर आपलं मनच असतं. आपण आणि आपलं मन काही दोन वेगळ्या गोष्टी थोडी आहेत. प्रसंगी काही वेळा फारकत होते मनाची आणि शरीराची. अन्यथा या दोन गोष्टी एकच आहेत. म्हणताना आपण तन-मन असा जोडीचा शब्दप्रयोग वापरतो. तरीपण शरीर आणि मन काही वेळा एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. आपल्या जीवाची कुतरओढ करतात.
आता तुम्ही म्हणाल हा जीव कुठून आला. तर ते मनाचं वेगळं नाव आहे. मनाला नावे तरी किती आहेत? वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या भावनेत त्याची नावे बदलत जातात. मग तेही वेडं लाडावतं! आश्चर्य वाटतं ते संताच्या मनाचं! त्यांची मन नाही का नाठाळत? वेड्यासारखी वागत? कसं ते आपल्या मनाला जेरबंद करतात? कसं आपल्या कह्यात ठेवतात? खूप विचार केला की आपण शेवटी देवावर सोडतो. नाही आपलं मन आवरत तर काय करणार? असा प्रश्न स्वत:ला विचारून गप्प बसते. मनाच्या भरवशावर मला मी सोडून देते. कधी ते चांगलं वागतं तर कधी नको इतकं वाईट. आपल्याला लाज आणतं.
लहानपणीच्या कथांमध्ये नेहमी दोन मनाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. एक असतं चांगलं मन. एक असतं वाईट मन. त्याला नावंही दिली जायची. कथा आपल्याला हवी तशी रचली जायची. तेव्हा वाटायचं आयुष्यसुद्धा असंच आपण रचू. निवडून चांगल्या घटनांनी जीवनाची साखळी गुंफू. यासाठी कथेतल्या चांगल्या मनाची खूप खूप मदत घेऊ. आपलं तर ते मन अगदी हक्काचं! जरूर मदत करेल आपल्याला. पण पाठीवरच्या वेताळाच्या मनात काही वेगळंच होतं आणि नकळत्या क्षणी तो जास्त प्रभावी ठरला. साऱ्या आयुष्याचा लेखाजोखा पार बदलून टाकला. आता शोधू म्हटलं चांगलं मन, तर चांगले विचार सापडत नाहीत. वाईट विचार मनातून जात नाहीत.
आपली दिवसाची सुरुवात मनाच्या सोबतीनंच होत असते. किंवा असंही म्हणता येईल की मनाचा कौल पाहून आपण दिवसाची सुरुवात करतो. दिवस पालटतात, तू बदलत जातात. मनाचं वेडेपणं प्रत्येक तूनुसार वाढत जातं. आता तर पाऊस सुरू झाला, वेडे मन अधिकच वेडे होणार. त्याला त्याच्या लहरीवर सोडायचं ठरवून गप्प बसायचं ठरवतेय, तोच पुन्हा पाऊस पडायला सुरुवात झाली.
कडुलिंबाच्या काळ्याभोर खोडाला फुटलेली नवी पोपटी पालवी पावसाळी रात्रीच्या पांढऱ्या प्रकाशात डोळ्यात भरू लागली. करवंदाच्या दाट जाळीतल्या प्रत्येक पानावर पावसाच्या पाण्याचे थांबलेले थेंब रस्त्यावरील सोडियमच्या पिवळ्या प्रकाशात आरसपानी काचमण्यांसारखे चमकू लागले. पावलांनी लांबवलेला झोका उंच जात परत माघारी येऊ लागला आणि मला माझ्यासकट माझ्याच मनाजवळ रेंगाळू देत राहिला. “ये ना हाताला धरून’ मी त्याला म्हटलं. “सांग ना जरा तू कसा आहेस ते? मलाच नाही तर सगळ्या जगाला प्रश्न आहे तझ्या अस्तित्वाचा.’
हाताची घडी घालून ते माझ्याकडे बघून हसलं. “तूच शोध ना मला. तुमच्याजवळ तर राहतो मी,’ मलाच कोडं घालीत ते म्हणालं. बायकांना फार सवय असते ना मला वेठीला धरायची! जरा काही झालं की माझं कोणीचं ऐकत नाही, मनासारख काही होतंच नाही…’
माझी म्हणजे आपल्या सर्वांचीच ते नक्कल करीत होतं. मी म्हणाले, “खरं सांगू तू म्हणतोस ते खरचं आहे बघ! मीच नाही तर गेल्या अनेक पिढ्यांमधील स्त्रियांचं हेच दु:ख आहे. मन मारून संसार करतात माझं माझं म्हणत जीव रेटतात आणि कधीतरी जाणीव होते अरे खरंच आपल्या मनासारखं आतापर्यंत काय बरं घडलं. उत्तर नकारार्थीच असतं किंवा उत्तर शोधावं अशी निकडच आता पावतो मिळालेली नसते. दिवस थोडे राहिलेले असतात. मग सुरू होते मनाची शोधाशोध! पण ते बिचारं सापडत नाही.
आमची एक काकू म्हणायची, लग्न होऊन घरात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मनाला मी समोर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवले आहे आणि संसार केला. पण तिच्याकडे पाहून असं वाटायचं मन जवळ नसताना इतका नेटका संसार हिने केलाच कसा? मनापासून जर संसारात रमली असती तर… ती गेली तेव्हा खरंच एक अनोळखी पक्षी त्या पिंपळाच्या ढोलीतून उडताना मी पाहिला होता. ते म्हणजे तिचे मन होते का रे?’
मी स्वत:शीच बोलत होते. मलाच प्रश्न विचारीत होते. माझी विमनस्कता मला जाणवत होती. हाताची घडी घालून उभं असलेलं मन तसंच हसत होतं. माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता. झोका थांबला होता. क्षणात मला उमगलं, अरे हा तर केवळ आभास आहे. मन आपल्यापासून वेगळं नाही. मनाला काही आकार नाही, रूपं नाही, ते आपणच आपले असतो. आपल्यातून बाहेर पडायचं आणि स्वत:ला निरखायचं की ते सापडतं. एरवी ते आपल्याचं व्यक्तिमत्त्वाचा भाग असते.