लखनौ – लखीमपूर खेरी येथील टिकुनिया हिंसाचार प्रकरण खूप चर्चेत होते. लखीमपूर ते लखनौपर्यंत बराच गदारोळ झाला. विधानसभेच्या 8 जागा असलेल्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील या हिंसाचाराचा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो, असे मानले जात होते. या मुद्द्यावरून विरोधकांनीही जोरदार हल्लाबोल केला. असे असतानाही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या जिल्ह्यातील 8 पैकी 8 सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरीमध्ये पालिया विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हरविंदर सिंग साहनी रोमी, कास्ता विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सौरव सिंग सोनू, धौरहरा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विनोद शंकर अवस्थी, श्रीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मंजू त्यागी, गोला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अरविंद गिरी, निघासन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शशांक वर्मा यांनी निवडणूक जिंकली आहे. लखीमपूर सदर जागेवरून भाजपचे उमेदवार योगेश वर्मा तर मोहम्मदी जागेवरून लोकेंद्र प्रताप सिंह विजयी झाले आहेत.
लखीमपूर हिंसाचार प्रकरण-
शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. लखीमपूर खेरी येथेही निदर्शने सुरू होती. दरम्यान, 3 ऑक्टोबर 2020 ला टिकुनिया परिसरात कुस्तीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी पोहोचणार होते. आंदोलक शेतकऱ्यांनी शांततेत मोर्चा काढला. त्याचवेळी आशिष मिश्रा यांच्यासोबत शेतकऱ्यांची हाणामारी झाली आणि शेतकरी पुढे सरसावले, मात्र टिकुनिया परिसरात शेतकऱ्यांचा मोर्चा पुढे सरकत असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अनेक शेतकऱ्यांना चिरडले. टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रावर हा आरोप होता. शेतकऱ्यांवर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. यानंतर हिंसाचाराच्या आगीत होरपळलेल्या लखीमपूरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपवर काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.