संयुक्तराष्ट्रे: सध्या जगभर ज्या करोनाच्या साथीने थैमान घातले आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नीट समन्वय दिसत नाही, ज्या त्या देशांनी आपल्या वैयक्तिक पातळीवरच करोनाची उपाययोजना सुरू केली आहे अशाने हा रोग आटोक्यात येण्याची शक्यता नाही अशी चिंता संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तेनिओ गुर्टेरेस यांनी व्यक्त केली आहे.
असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. ही जागतिक महामारी आहे आणि त्याचा मुकाबला आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वयाने केला पाहिजे पण दुर्देवाने प्रत्येक देश स्वतंत्रपणे त्याच्यावर उपाययोजना करीत आहे, त्यातून हा रोग आटोक्यात येईनासा झाला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरून ठोस धोरण ठरवून त्यावर उपाययोजना केली गेली पाहिजे.
चीन मधून निर्माण झालेला करोना जागतिक स्तरावर पोहचला आहे, आता या रोगाची दुसरी मोठी लाट येत असल्याचे लोक सांगत आहेत. पण तरीही अजून जगाला त्यावर समन्वयाने उपाययोजना करावी याची जाणिव झालेली नाही ही निश्चीतच चिंतेची बाब आहे. करोनावरील उपचार पद्धती, चाचणी पद्धती आणि औषधांचा वापर याचे एकसमान सूत्र ठरवणे गरजेचे आहे. पण त्या दिशेने प्रयत्नच होताना दिसत नाहीत.
करोनामुळे केवळ वैद्यकीयच आव्हानाची स्थिती निर्माण झालेली नाही तर संपुर्ण जगाचेच अर्थकारण बिघडल्याने मानवी हक्क, गरीबी निर्मूलन, रोजगार निर्मीती हे सारेच विषय अडचणीत आले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जगापुढे निर्माण झालेले हे एक मोठे आव्हान आहे. आज जगातील सर्व संघर्ष थांबवून आता केवळ करोनाच्या मुकाबल्याकडे जगाने लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.