कुरवली-येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत वर्ग खोल्या, स्वच्छतागृह, सरक्षंक भिंत आदींची गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन शाळा व्यवस्थापन व पालकांच्या वतीने देण्यात आले आहे.
या शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे 88 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या मुलांना असणारे स्वच्छतागृह फक्त नावाला उरले आहे. खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. आतील भांड्याची तोडफोड झाली आहे. त्यामुळे सध्या स्वच्छतागृह बंद स्थितीत आहे.
या शाळेत ज्ञान दान करणारे शिक्षक व विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतागृह नजीक विद्युत रोहित्राची दुरवस्था झाली आहे. त्याचे उघड्यावर फ्यूज बॉक्स आहेत. शाळेला संरक्षक भिंत बांधकाम तसेच स्वच्छतागृहाची दुरुस्तीची मागणी पालकवर्गातून अनेक दिवासांपासून करीत आहेत. गावातील जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेऊन शाळेतील सुविधांची उपाययोजना करणे आवश्यक आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आयुब सय्यद, सुभाष सपकळ, नीलेश पांढरे, राजेंद्र माने, अजय सपकळ, शंकर थोरात यांनी निवेदन दिले.