- पवना धरणातून 10 हजार क्युसेक विसर्ग होणार
- काले स्माशानभूमीतील निवारा शेड पाण्याखाली
पवनानगर, दि. 16 – पवना धरणातून 10 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आज शुक्रवारी (दि. 16) दुपारी एक वाजल्यापासून 7800 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने कोथुर्णे पुल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत आहेत. त्यामुळे परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोथुर्णे पुलावरून पाणी असल्यामुळे नागरिकांनी ये-जा करू नये व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यातुन व जलविद्युत केंद्रातुन 7 हजार 800 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने पवना नदीवरील कोथुर्णे पुल पाण्याखाली गेला आहे.तर सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सुरुवातीला 7800 क्युसेक्सने विसर्ग सुरू केला होता. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दुपारी तीननंतर हा विसर्ग वाढवून 10 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काले येथील स्मशानभूमीचे निवारा शेड पाण्याखाली गेले असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी पावसाचा जोर असेपर्यंत सतर्क राहिले पाहिजे. कोथुर्णे पुलावरून पाणी वाहत असल्याने पवना विद्या मंदिर या शाळेला सुट्टी दिली असून पालकांनी मुलांना सुरक्षितरित्या घरी न्यावे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारा येवा याचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.