डॉ. नरेंद्र भूतकर
ध्वनी जेव्हा संगीताला उपयुक्त होतात तेव्हा त्यांना नाद असे म्हणतात. नादांची कंपनसंख्या जेव्हा नियमित आणि टिकून राहणारी होते तेव्हा त्यांना स्वर म्हणतात. स्वरांच्या उगमाचा शोध घेतला तर श्रुती दिसू लागतात आणि श्रुतींच्या प्रकाशात संगीताच्याच उगमाचा शोध घेणाऱ्या कलाकारास श्रीमती किशोरी आमोणकर असे म्हणतात.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा महान आहे. महान परंपरेचा एक मोठा फायदा असतो. गहन विषय जाणून घेण्यासाठी बनवलेली शेकडो वर्षांपासूनची सूत्रे आणि यमनियम आयते उपलब्ध असतात. पण महान परंपरेचा एक मोठा तोटा असतो. या सर्व सूत्रांच्या जंजाळात माणूस अडकतो आणि मूळ केंद्रस्थानी असलेल्या सत्यापासून दूर जातो. भारतीय परंपरेमध्ये असे घडलेले आहे. रूढींच्या गुंत्यामधून मूळ सत्याचा शोध घेण्याचे कार्य धर्मक्षेत्रात गौतम बुद्ध, आदि शंकराचार्य इत्यादींनी केले. संगीत क्षेत्रात हे कार्य आधुनिक काळात कुमार गंधर्व आणि किशोरीजी आमोणकर यांनी केले.
किशोरीजींचा जन्म “जयपूर’ घराण्याच्या महान गायिका श्रीमती मोगूबाई कुर्डीकर यांच्या पोटी झाला. माता ही मुलाची सर्वप्रथम गुरू असते हे याबाबतीत शब्दशः खरे होते. पण किशोरीजी फक्त सात वर्षांच्या असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी मोगूबाईंवर पडली. जुना पुराणमतांचा काळ, एकटी स्त्री, तीन मुलांचे संगोपन, त्यांचा आर्थिक खर्च आणि त्यांच्यावर सुसंस्कार हे सर्व करण्यासाठी कोठलीही नोकरी नाही. उपलब्ध साधन एकच शास्त्रीय संगीत, साधन कसले, व्रतच. त्याच्या अभिजातपणामध्ये कुठलीही तडजोड न करता हा प्रपंच चालवणे हे अशक्य काम मोगूबाईंनी कसे करून दाखवले हे त्यांनाच ठाऊक. तराजूच्या एका पारड्यात पृथ्वीवरील सर्व धन घातले आणि दुसऱ्या पारड्यात सत्य ठेवले तर सत्याचेच पारडे जड ठरले ही तुला सत्ययुगामध्ये ठीक होती. पण त्या दुसऱ्या पारड्यातले थोडेही धन हाताशी नसताना मोगूबाईंनी कलियुगामध्ये सत्याचे प्रमाण सिद्ध केले. पण याची किंमत त्यांना मोजावी लागली. आपले कार्यक्रम, संगीताच्या शिकवण्या आणि घरकाम यामधून आपल्या स्वतःच्या मुलीला शिकवण्यासाठी स्वतंत्र वेळ माईंना (मोगूबाईंना) काढता आला नाही. एका मुलाखतीमध्ये किशोरीजी सांगतात की “काम करता करताच माई मला शिकवायची. किंवा ती इतर विद्यार्थिनींना शिकवताना मी ऐकायचे व त्याचाच रियाझ करायचे.’ तरीही माईंची शिकवण काटेकोर होती. स्वरांच्या अस्सलपणामध्ये जराही तडजोड झालेली माईंना खपत नसे. याचे एक उदाहरण म्हणजे 1964 सालच्या “गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटात तेच शब्द असलेले “दुर्गा’ रागावर आधारित एक गाणे तरुण किशोरीजींनी उत्कृष्ट गायिले आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आर्थिक प्राप्तीही झाली. पण त्यांच्या आईला-माईंना ते पसंत नव्हते. गाणे एवढे सुंदर गायिले तरी ते शास्त्रीय संगीत नव्हते. त्यांनी मुलीला सांगितले, “तू असले संगीत गाऊ नयेस आणि जर गायचे असेल तर मी तुला शिकवणार नाही आणि माझ्या तानपुऱ्याला तुला हात लावू देणार नाही!’
चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची जी संधी अनेकांच्या आयुष्यात सुवर्णसंधी ठरली असती ती माईंना आपल्या मुलीसाठी त्याज्य होती. हा निर्णय “प्रॅक्टिकल’ नव्हता असे ज्यांना वाटते अशांसाठी आयन रॅंड यांचे एक वाक्य आहे- ‘Whether something is practical or not depends on what you want to
practice! ज्यांचे ध्येय अंतिम आहे त्यांना धन, सिद्धी, मानमरातब या उपाधी अनावश्यक नव्हे तर अडचणीच्या वाटतात.
आपल्या आईचा आदेश मान्य करून किशोरीजींनी चित्रपट गायनाचा त्याग केला आणि माईंचा तानपुरा हातात घेतला आणि जणू संगीताच्या आत्मवेधाचे व्रतच हाती घेतले. “वीणा सप्ताह’ या व्रतामध्ये आठवडाभर वीणा हातून खाली न ठेवता अखंड नामसंकीर्तन चालू ठेवायचे असते. मग आळीपाळीने अनेक हात ती वीणा हप्ताभर चालून धरतात. किशोरीजींनी माईंचा तानपुरा हातात घेतला तो आयुष्यभर खाली न ठेवण्यासाठी आणि तोही एकटीने.
या व्रताचरणामध्ये त्यांनी आपल्या आईव्यतिरिक्त इतर घराण्यांच्या दिग्गज गुरूंकडूनही शिक्षण घेतले. त्यामध्ये अंजनीबाई मालपेकर, उस्ताद अन्वर हुसेन, शरच्चंद्र आरोळकर व इतर अनेकांचा समावेश होतो. या सर्व घराण्यांचे संस्कार किशोरीजींनी आपल्या जयपूर गायकीच्या गाभ्यावर करून एक स्वतःची मुद्रा बनवली. घराण्याच्या सीमारेषा कोणत्याही मर्यादेपर्यंत ताणता येतात याची जणू त्यांनी कसोटीच पाहिली. घराणे शिष्यांची कसोटी पाहते पण अन्तःशोध घेणाऱ्या साधकाला कुठलीही मर्यादा- मग ती कितीही भव्य असली तरी एका विशिष्ट टप्प्यानंतर बंधनकारक ठरते. कुमार गंधर्व यांनी हेच केले. किशोरीजींनीही तेच केलं. या दोघांनीही काही काळ अंजनीबाई मालपेकरांकडे शिक्षण घेतले हा योगायोग वाटत नाही.
घराण्याची बंधने ओलांडायची किशोरीजींना गरज वाटण्याचे मुख्य कारण संगीताच्या परंपरेपेक्षा त्यातला भाव त्यांना अधिक भावला. यमनियम, उपचार हे सर्व मुमुुक्षु साधकांसाठी. पण साधकांचे सिद्ध होताना हेही गळून पडावे लागतात. भजन, पूजन करणारे भक्त असतात आणि “न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः’ असे निर्वाणषटक् रचणारेही भक्त असतात. किशोरीजींनी संगीतसाधना ही या दुसऱ्या प्रकारची होती. अर्थात एक कलाकार म्हणून या साधनेचे जाहीर प्रकटीकरण करण्याचे कर्तव्य त्यांनी चुकवले नाही. 1960 आणि 1970 या दशकामध्ये त्यांचे गाणे बहरले. प्रत्येक मैफल ही एक शोधक्रिया असे. परंतु अन्तःशोध हा एकट्याचा प्रवास. त्याच्या जाहीर प्रकटीकरणामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. ध्वनीक्षेपकाची लहानशी चूक, नको ते आवाज, इतकेच नव्हे तर समोर बसलेल्या महिलांच्या साड्यांचे अवाजवी चमकदार रंग या सर्व कारणांमुळे किशोरीजींनी मैफल काही काळ थांबवली असे घडले आहे. यामुळे त्यांच्यावर मूडी, मनस्वी, चिडखोर असल्याची टीका झालेली आहे.
अर्थात याची त्यांनी फारशी पर्वा केली नाही. कार्यक्रमाच्या आधी आणि मध्यंतरामध्ये त्यांना कुणाशीही संपर्क नको असे. जो राग गायचे ठरवले असेल त्या रागाशी कार्यक्रमाआधी तादात्म्य साधण्यासाठी त्यांना एकांत हवा असे. त्यांचे स्वरमंडल त्यांना सुरांमध्ये नव्हे तर श्रुतींमध्ये जुळवायचे असे. एक एक तार वेगळी छेडली तर जवळजवळ बेसूर पण त्याच तारा लागोपाठ छेडल्यावर त्यांच्यामधून चक्क राग उमटतो याचे कानावर विश्वास न बसणारे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले होते. पृथःक्करण आणि विघटन या प्रक्रियांद्वारे ज्ञान शोधू पाहणाऱ्या अविद्यांना उत्तर म्हणून संगीताच्या माध्यमातून एकीकरण आणि समष्टी यांच्या सम्यक ज्ञानाचा एवढा प्रत्ययकारी अनुभव किशोरीजींनी जसा दिला तसा इतर कुणी दिला नसेल.
“हे नरहर नारायण’ या “बिभास’ रागामधल्या बंदिशीचा धैवत “उतरी’ आहे. तो कोमल लावला तर दीनपणे क्षमायाचना केल्यासारखे होईल आणि शुद्ध लावला तर उद्दामपणा होईल. हे दोन्ही नको आहे… इथे फक्त नारायणासमोर विकल्परहित भक्त प्रार्थना करत आहे…’
“मी हल्ली षड्ज लावायचे कमी केले आहे. कारण षड्ज हा आदी स्वर. सर्व स्वरसप्तक षड्जमधून जन्म घेते. सर्व संगीत विश्वाची उत्पत्ती करणारा हा षड्ज या अर्थाने स्वयंभू ईश्वर आहे. त्याला पुन्हा पुन्हा गाणे हा कुठेतरी अधिक्षेप तर नाही असे मला वाटते. मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्या, फारतर थोडे आत जा. पण अगदी गाभाऱ्यात शिरून मूर्तीला वारंवार हात लावणे जसे चूक आहे तसेच हे…
यासारख्या त्यांच्या वक्तव्यांना एखाद्या ऋषीमुनींच्या दिव्य वाणीचा सुगंध येऊ लागतो. या सुगंधाच्या प्रत्ययामुळे त्यांना “गानसरस्वती’ ही यथार्थ उपाधी मिळाली. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, संगीत सम्राज्ञी पुरस्कार, पद्मविभूषण, एम. एस. सुब्बलक्ष्मी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या जीवनावर आधारित “भिन्न षड्ज’ हा अमोल पालेकर दिग्दर्शित माहितीपट उपलब्ध आहे. तसेच मल्हार मालिका व इतर अनेक ध्वनिमुद्रणं उपलब्ध आहेत. आपले संगीतविषयक विचार व्यक्त करणारे “स्वरार्थ रमणी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले तेही उपलब्ध आहे. त्यांच्या शिष्यवर्गामध्ये रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर, नात तेजश्री आमोणकर, नंदिनी बेडेकर असे कलाकार आहेत. 3 एप्रिल 2017 रोजी मुंबईच्या आपल्या राहत्या घरी किशोरीजींचा झोपेत शांतपणे मृत्यू झाला.
(शब्दांकन- डॉ. विकास आबनावे)