नाशिक – नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घरापासून अपहरण केले होते. त्यानंतर काही तासातच पारख हे सुखरूप घरी पोहचले, मात्र या घटनेतील अपहरणकर्त्यांचा तीन दिवस उलटूनही अद्याप तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर संशयितांच्या शोधासाठी परराज्यासह इतर ठिकाणी पोलिसांची 8 पथके रवाना करण्यात आली असून तपास प्रगतीपथावर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पारख यांचे नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील राहत्या घराबाहेरुन 2 सप्टेंबरला अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुदैवाने दुसऱ्या दिवशी दुपारी ते घरी सुखरुप परतले होते, मंत्री छगन भुजबळांसह भाजपच्या स्थानिक आमदारांनी पारख यांची घरी जाऊन भेट देखील घेतली होती. विशेष म्हणजे या घटनेला आता तीन दिवस उलटून देखील अपहरणामागील गूढ अद्याप कायम आहे.
चारचाकीमधून अपहरण करताच त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली होती आणि सुरतजवळ त्यांना सोडून देण्यात आले होते. दरम्यान पारख यांचे अपहरण नक्की का करण्यात आले होते? कोणी केले होते? याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. स्वतः हेमंत पारख किंवा कुटुंबीयही या घटनेवर बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.