पुणे – खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात धाराशिव संघाने विजेतेपद संपादन केले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत धाराशिव संघाने कोल्हापूर अ संघाचा १५-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
विजयी संघाकडून प्रतीक्षा माळी (१० गुण), अदिती राऊत (५ गुण) यांनी सुरेख कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मृदुला मूर्ती (५ गुण), आरती खांडेकर (१० गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सातारा अ संघाने मॅजिशियनचा १५-० असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत धाराशिव संघाने सातारा अ संघाचा ५-० असा तर, कोल्हापूर अ संघाने मॅजिशियनचा १०-० असा पराभव अंतिम फेरी गाठली. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय महिला रग्बी संघाच्या माजी कर्णधार वाहबिझ भरुचा यांच्या हस्ते करण्यात आले.