लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी म्हणून शाळांची वेळ खूप लवकर न ठेवता थोडी उशिरा ठेवावी, अशी सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यामुळे एका नवीन विषयावर पुन्हा एकदा चर्चा होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याच्या एका कार्यक्रमामध्ये अधिकृत व्यासपीठावर राज्यपालांनी ही सूचना केल्यामुळे राज्य सरकार या सूचनेची दखल घेऊन शाळांच्या वेळांमध्ये बदल करणार की नाही हेसुद्धा पहावे लागणार आहे. अर्थात, गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाला ज्या प्रकारचे एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे ते पाहता राज्यपालांच्या या सूचनेची अंमलबजावणी करताना विविध प्रकारच्या अडचणी येणार आहेत. तरीसुद्धा राज्यपालांच्या या सूचनेमागील गांभीर्य महत्त्वाचे आहे. ‘लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा लाभे’ अशा प्रकारची म्हण बहुतेक सर्वच नागरिकांनी आपल्या लहान वयात पाठ केलेली असते.
पण ही म्हण प्रत्यक्षात किती जण आणतात किंवा आपल्या मुलांसाठीसुद्धा या म्हणीचे महत्त्व ते जाणून असतात हा संशोधनाचा विषय असू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून आधुनिक उपकरणांचा वापर वाढत चालला आहे तेव्हापासून रात्री लवकर झोपणे हा विषयच बाजूला पडला आहे. साहजिकच मुले रात्री उशिरा झोपली तरी शाळेसाठी त्यांना लवकर उठवावेच लागते आणि त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अपुर्या झोपेमुळे आरोग्याचे विविध प्रश्नही तयार होऊ शकतात. लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढणे किंवा अभ्यासात एकाग्रता न राहणे किंवा पोटाच्या तक्रारी अशा प्रकारच्या विविध समस्या केवळ झोप पूर्ण न झाल्यामुळे निर्माण होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचेही मत आहे. सर्वसाधारणपणे लहान मुलांना किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आणि अपेक्षित असते.
म्हणजेच लहान मुलांनी रात्री नऊला किंवा उशिरात उशिरा 10 पर्यंत जरी झोपण्याची प्रक्रिया सुरू केली तरीसुद्धा त्यांना पुरेशी झोप मिळू शकते. पण गेल्या काही वर्षांमध्ये टीव्ही आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्येच रात्री किमान 12 पर्यंत लहान मुलेही जागी असतात. घरातील पालकच उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्यामुळे आपोआपच लहान मुलेसुद्धा जागी राहतात. अनेक पालक मुलांची जी रात्रीची अपुरी झोप आहे ती त्यांना दिवसा मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते दुपारची झोप हीसुद्धा आरोग्याला हानिकारक असू शकते. आधुनिक काळामध्ये शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करणार्या पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलाच्या खांद्यावर इतक्या प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची ओझी पालकांनी टाकलेली असतात की त्याला 24 तासांचा दिवसही मुळात कमी पडतो.
शाळेतील काही तासांचे शिक्षण झाले की कुठले ना कुठले क्लास लावले जातात. एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीच्या नावाखाली अनेक उपक्रमांमध्ये नाव नोंदणी केली जाते. साहजिकच एकीकडे अपुर्या झोपेमुळे निर्माण होणारे प्रश्न आणि दुसरीकडे पालकांच्या वाढता अपेक्षा याचे ओझे नेहमीच लहान मुलांच्या मनावर आणि खांद्यावर राहते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच राज्यपालांनी केलेल्या सूचनेचा गांभीर्याने विचार करून शिक्षण तज्ज्ञांनी शाळेच्या वेळेमध्ये खरोखरच बदल करता येतो का, हे पाहायला हवे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्या प्रमाणात शाळांची आणि शाळांच्या इमारतींची संख्या वाढली नसल्याने एकाच शाळेच्या इमारतीमध्ये दोन बॅचमध्ये शाळा भरवण्याचा उपक्रम सर्वच शैक्षणिक संस्था करतात.
अशा वेळी कोणत्या ना कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सकाळीच बोलवावे लागणार आहे. साहजिकच सकाळी लवकर शाळा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. हा जर प्रमुख विषय असेल तर ही झोप पूर्ण होण्यासाठी लवकर झोपणे हाच एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्याकडे पालकांनीच मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. मूळात हा विषय फक्त लहान मुलांपुरता मर्यादित नाही तसेच लवकर झोपणे हा नियम फक्त लहान मुलांसाठी आहे असेही नाही. साहजिकच पालकांनी स्वतः लवकर झोपण्याची सवय लावून घेतली, तर त्याचा सकारात्मक परिणाम आपोआपच लहान मुलांवर होऊ शकतो. कोणत्याही कुटुंबातील प्रत्येकच घटकाला सकाळी लवकर उठून आपापली कामे पूर्ण करण्याची गडबड असते. कोणाला शाळेत जायचे असते, कोणाला नोकरीवर जायचे असते, अशावेळी सकाळी उठायची वेळ जर निश्चित असेल तर रात्री झोपण्याची वेळसुद्धा निश्चित झाली आणि आपल्याला किती वेळ झोप आवश्यक आहे याचे गणित जर प्रत्येक कुटुंबाने मांडले तर अपुर्या झोपेचा विषयही संपून जाऊ शकतो.
अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या मते, सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा मेंदू जास्त तल्लख असल्यामुळे ते अभ्यास जास्त तीव्रतेने करू शकतात. विविध गोष्टींचे आकलनही याच कालावधीमध्ये त्यांना जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकते. अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या मते, शाळेची सकाळची वेळच ही आदर्श मानायला हवी. साहजिकच केवळ विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही म्हणून शाळेची वेळ बदलण्याचा विषय समोर आला असेल, तर त्यापेक्षाही विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी लवकर झोपायला हवे, हा एक पर्याय आता प्राधान्याने समोर येण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांमधील समुपदेशक किंवा या क्षेत्रात काम करणारे आरोग्य तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ या सर्वांनीच याबाबत पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे. केवळ विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही म्हणून शाळा उशिरा भरवण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी विद्यार्थ्यांची झोप कशी पूर्ण होईल या विषयाकडेच जास्त प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.
हा विषय संपूर्णपणे संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाकडे म्हणजेच पालकांकडेच केंद्रित झाला आहे हेसुद्धा विसरून चालणार नाही. लहान वयात विद्यार्थ्यांच्या खांद्यावर विनाकारण अनावश्यक ओझे न टाकता आणि स्पर्धेच्या धावत्या जगात अनावश्यकपणे त्यांना न ढकलता त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांचे आरोग्य कसे परिपूर्ण होईल यावरच आता पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण निरोगी मुलगाच जास्त चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो, हेही विसरून चालणार नाही.