रेडा – खडकवासला कालव्यामधून इंदापूर तालुक्यातील लाभक्षेत्रामध्ये असलेल्या सर्व तलावांमध्ये पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी जलसंपदाच्या अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांना दिले आहेत. खडकवासला कॅनालमधून शेतीला पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासल्याचे पाणी आज रविवारी इंदापूर तालुक्यात पोहोचणार आहे, अशी माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदापूर येथे आज (रविवारी) पाटील यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.
हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री डॉ. महाजन यांच्याशी (दि.8) दूरध्वनीवरून इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली. चर्चेमध्ये मंत्री महोदयांनी खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील पोंदकुलवाडी, बिजवडी, कौंठळी, न्हावी, रूई, पळसदेव, काळेवाडी, डाळज, कळस, भादलवाडी, पोंधवडी, मदनवाडी, अकोले, निरगुडे, शेटफळगढे, म्हसोबावाडी, तरंगवाडी येथील पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी मान्य केली. त्यानुसार तातडीने आदेश महाजन यांनी संबंधितांना दिले.
वीर धरणातून शेटफळ तलावामध्ये सध्या नीरा डावा कालव्यामधून पाणी सोडले जात आहे. शेटफळ तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून घेण्याची मागणी मंत्री महाजन यांनी मान्य केली आहे.
पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याशी चर्चा केली. जलसंपदा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार खडकवासला लाभक्षेत्रातील सर्व तलावात पाणी सोडण्याचे व शेतीला आवर्तन देण्याचे नियोजन तातडीने केले जाईल, असे त्यांनी पाटील यांना सांगितले. सणसर कटमधून इंदापूर तालुक्याच्या हक्काचे 4 टीएमसी पाणी हे नीरा डावा कालव्यात शेतीसाठी आगामी काळात उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पाणी उपलब्ध देण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन करावे, असा आदेश जलसंपदा मंत्री महाजन यांनी अधीक्षक अभियंता चोपडे यांना दिला आहे.