थिरूवनंतपुरम – केरळात दोन राजकीय पक्षांच्या नेत्यांची लागोपाठ हत्या झाल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. यातील एक नेता एसडीपीआय पक्षाचा आहे तर दुसरा नेता भाजपचा आहे.
या दोन नेत्यांच्या हत्यांचा मुख्यमंत्री विजयन यांनी तीव्र निषेध केला आहे. या दोन्ही हत्यांना जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या दोन्ही हत्या अलपुझा जिल्ह्यातील आहेत.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, अशा स्वरूपाच्या अमानवीय हिंसक घटना देशाच्या हितालाही बाधक आहेत अशा हिंसक गटांपासून आणि त्यांच्या कारवायांपासून लोकांनी दूर राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एसडीपीआय म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रदेश सेक्रेटरी के. एस. शान यांच्यावर शनिवारी रात्री हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्या पक्षाने केला आहे.
त्यांच्या हत्येच्या प्रकारानंतर काही तासांनी याच जिल्ह्यातील भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सेक्रेटरी रणजीत श्रीनिवास यांचीही हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या घरावरच हल्ला करून त्यांना ठार मारले. शान यांच्या हत्येचा बदला म्हणून श्रीनिवास यांची हत्या करण्यात आल्याचे मानले जात आहे.