नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन सिंगापूर विषाणूंची बाधा होण्याच्या संबंधात जे विधान केले आहे त्यामुळे सध्या मोठेच वादंग निर्माण झाले असले तरी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मात्र केजरीवालांच्या विधानांचे समर्थन केले आहे.
आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात अत्यंत सवंग पद्धतीचे राजकारण सुरू केले आहे. केंद्र सरकार आणि भाजपकडून या प्रकरणात जी विधाने प्रसिद्ध झाली आहेत ती पाहता त्यांना भारतातील मुलांच्या काळजीपेक्षा सरकारच्या प्रतिमेचीच अधिक चिंता लागून राहिली आहे असे दिसते आहे, असे ते म्हणाले.
केजरीवालांनी सिंगापूरच्या विषाणूंचा उल्लेख करून त्याचा लहान मुलांवर अत्यंत घातक परिणाम होतो असे केजरीवाल म्हणाले आहेत, त्यांनी सिंगापूर या देशाविषयी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, असेही सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, या आधी लंडनचा विषाणू भारतात येण्याचा जो धोका वर्तवण्यात आला होता त्यावेळी भारत सरकार त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले त्यामुळे देशात करोनाची मोठी लाट आली आणि त्यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.