गुवाहाटी -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भ्याड आहेत. त्यांचे धाडस दिल्ली विधानसभेपुरतेच मर्यादित आहे, असे टीकास्त्र आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी सोडले. केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभेत बोलताना सर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर जाहीर सभेसाठी आसाम दौऱ्यावर येणाऱ्या केजरीवाल यांना सर्मा यांनी याआधीच इशारा दिला होता.
माझ्या विरोधात विधानसभेबाहेर बोलल्यास मानहानीचा खटला दाखल करेन, असे सर्मा यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांची रविवारी आसाममध्ये सभा झाली. मात्र, त्यांनी सर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे टाळले. त्याचा संदर्भ देऊन सर्मा यांनी पुन्हा केजरीवाल यांना लक्ष्य केले. विधानसभेत बोलण्याचे संरक्षण असल्याने केजरीवाल तिथे बोलले. मी त्यांच्या विरोधात पाऊले उचलू शकलो नाही.
त्यामुळे विधानसभेबाहेर बोलण्याचे आव्हान मी त्यांना दिले होते. ते सभेत बरेच काही-बाही बोलले. पण, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे त्यांनी टाळले, असे सर्मा यांनी म्हटले. विविध मुद्द्यांवरून केजरीवाल आणि सर्मा यांच्या सातत्याने शाब्दिक युद्ध होत असते.