मांडवगणमध्ये क्रांती पॅनलची जाहीर आभार सभा
मांडवगण फराटा : सरकार तुमचे आहे ना, मग ज्यांनी पुनर्वसनाच्या जमिनी लाटल्या, त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करायला हवा. पक्षीय जोडे बाजूला ठेवून यापुढे शेतकऱ्यांच्या हिताची कामे करायला हवीत. शेतकरी संघटना चांगले काम करत असून तिच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहायला हवे, असे प्रतिपादन महेश ढमढेरे यांनी केले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे घोडगंगा किसान क्रांती पॅनलचा आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यसम्राट म्हणवून घेणाऱ्यांना त्यांच्याच वडगाव रासाई, मांडवगण फराटा, इनामगाव या गटांत आघाडी घेता आली नाही.त्यामुळे जरी पराभव झाला असला तरी नैतिकतेचा हा विजय झाल्याचे सुधीर फराटे यांनी सांगितले.
संचालक दादा पाटील फराटे म्हणाले की, घोडगंगा साखर कारखाना निवडणूक ही सभासदांच्या अस्तित्वाची लढाई होती. निवडणुकीत मतदारांनी किसान क्रांती पॅनलवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना खडे आव्हान निर्माण झाले. सत्ताधारी गट विजयी होऊन देखील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत नाही. एक रुपया न देता केलेले मतदान आम्ही वाया जाऊ देणार नाही.
शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे म्हणाले की, सरकार तुमचे आहे ना मग घोडगंगावर कर्ज कसे झाले, याची त्वरित चौकशी लावा. येत्या काळातील सर्व निवडणुका एकत्र येऊन लढून परिवर्तन व्हायला हवे.
प्रदीप कंद म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मोठ्या उमेदीने निवडणुकीत काम केले असून हे चांगले मताधिक्य हे कार्यकर्त्यांचे व मतदारांचे यश आहे. राज्य सरकारच्या वतीने लवकरच एक संचालक कारखान्यात पाठवणार आहे. दादा पाटील फराटे यांची चांगली प्रतिमा असल्याने त्यांना सभासदांनी कारखान्यात पाठवले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने ताकद उभी करण्याचं काम केले जाईल.
यावेळी आबासाहेब सोनवणे, काका खळदकर, बाळासाहेब घाडगे, अरविंद ढमढेरे, ऍड सुरेश पलांडे, सुरेश थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, संतोष मोरे, राजेंद्र कोरेकर पांडुरंग थोरात, राहुल पाचर्णे, जयेश शिंदे, रोहित खैरे, वीरेंद्र शेलार, गोविंद फराटे, आत्माराम फराटे, वैजयंता चव्हाण, पांडुरंग दुर्गे, लक्ष्मण फराटे, सुभाष फराटे, नितीन थोरात, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन मचाले यांनी तर आभार संजय फराटे यांनी मानले.