नवी दिल्ली – तेलंगणात सत्तेवर असणाऱ्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) 35 नेत्यांनी सोमवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी त्यांच्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली. त्या घडामोडीकडे केसीआर यांना होम पिचवरच बसलेला मोठा राजकीय हादरा म्हणून पाहिले जात आहे.
तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्णा राव, माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यासह काही माजी आमदार आणि जिल्हा स्तरावर प्रभाव असणाऱ्या नेत्यांचा बीआरएसला रामराम ठोकणाऱ्यांत समावेश आहे. त्यांनी दिल्लीतील सोहळ्यात कॉंग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल उपस्थित होते. तेलंगणात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी काही महिनेच शिल्लक असताना तेलंगणात पक्षबदलाच्या रूपाने मोठी राजकीय घडामोड घडली. त्यातून त्या राज्यात आगामी निवडणुकीमुळे राजकीय ज्वर वाढू लागल्याचे सूचित होत आहे.
यामुळे आले चर्चेत
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सध्या महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने राव हे आपल्या निवडक सहकाऱ्यासह पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन देखील घेणार आहेत.सध्या वारी सुरु आहे. अशात के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाले आहेत. वारीदरम्यान ठिकठिकाणी बीआरएस पक्षाचे बॅनर देखील झळकल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र विठुरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांनी मांसाहार केल्याच बोललं जात आहे. यावरून त्यांच्यावर टीका देखील सुरु झाली आहे.