नवी दिल्ली – महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण हा एक मुद्दा झाला. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून ब्रिजभूषण शरण सिंह यांची भारतीय कुस्तीगीर महासंघात सुरू असलेली मनमानी संपवणे हाच या आंदोलनामागचा हेतू आहे, असे वक्तव्य भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंनी केले आहे.
सध्या ब्रिजभूषण यांच्यावरील खटल्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस तपासही पूर्ण होत आला आहे. आता आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. केंद्र सरकार, केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलेला शब्द पाळावा व महासंघाची होणारी निवडणूक अत्यंत पारदर्शीपणे व्हावी या आमच्या मागण्या आहेत. दुसरीकडे पोलिसांनी अद्याप ब्रिजभूषण यांना अटक का केली नाही याचेही उत्तर आम्हाला हवे आहे, असेही बजरंगने म्हटले आहे.
केवळ एका सामन्यातील विजय हाच आमच्या आशियाई पात्रतेचा निकष ठेवला गेल्याने अनेकांना त्यांच्यावर अन्याय झाल्याचे वाटत आहे. मात्र, आम्ही हे आंदोलन सुरू केल्यावर सरावापासून, व्यायामापासून फारकत घेतली होती, त्यामुळे आमचे किती नुकसान झाले आहे हे कोणी लक्षात घेत नाही. आमची बाजू समजून घेण्याच्या ऐवजी योगेश्वर दत्तसारखे कुस्तीपटूच आमचा विरोध करत आहे याची खंत वाटते, असे महिला कुस्तीपटू विनेश फोगटने म्हटले आहे.
येत्या काळात आशियाई स्पर्धा आहे, त्यानंतर पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक आहे, त्यासाठी तयारी करण्यासाठी खूपच कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. आम्हाला न्याय मिळाला व आम्ही सरावाला किंवा स्पर्धेत परतलो तरच पदकाची आशा राहणार आहे. मनाने थकलेलो नाही. मात्र, या व्यवस्थेमुळे खूप निराश झालो आहोत.
एक महिना आंदोलन सुरु होते त्यावेळी सरकारमधील कोणालाही आमची काळजी वाटली नाही किंवा आमच्याशी संवाद साधावा असेही वाटले नाही ही शोकांतिका आहे. किमान आता तरी व्यवस्थेला जाग यावी व आम्हाला न्याय मिळावा ही आमची मागणी रास्त नव्हे का, असा सवाल सक्षी मलिकने केला आहे.
आता लढा न्यायालयात
रस्तांवर आंदोलन पार पडले आता खरा लढा न्यायालयात सुरु झाला आहे. आमच्या मागण्या व हेतू पूर्ण होइपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही न्यायालयीन लढाई निश्चितच जिंकू व महासंघात सुरु असलेली मनमानी व अन्याय संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार साक्षी मलिकने व्यक्त केला आहे.
…म्हणून निवडणुकीला स्थगिती
आसाम कुस्ती संघटनेने भारतीय कुस्तीगीर महासंघ, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महासंघाचे कामकाज पाहात असलेली हंगामी समिती व केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. आसाम कुस्ती संघटनेला भारतीय कुस्तीगीर महासंघाने संलग्न होण्याचा अधिकार होता.
2014 साली झालेल्या महासंघाच्या कार्यकारिणीच्या या बैठकीत आसाम कुस्ती संघटनेची शिफारसही करण्यात आली. मात्र तरीही संलग्नता मिळाली नाही. याच कारणामुळे आसाम संघटनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.