कात्रज – येथील संत खेतेश्वर चौकालगतच्या खासगी जागेत उभारण्यात आलेल्या “कात्रजचा खून झाला’ या बॅनरने परिसरात चांगलीच चर्चा रंगली. या बॅनरमध्ये रक्तरंजित चाकू असल्याने अज्ञातांनी लावलेला हा बॅनर महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून उतरविण्यात आला.
याबाबत कोणीही अधिकृत जबाबदारी घेतलेली नसून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनरबाजीमागे कात्रज येथील राजकारण की आणखी काही कारणे आहेत? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
येथील उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा मागील आठवड्यात झाला. त्यामुळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील भूसंपादनदेखील अर्धवट आहे. त्यामुळे रस्त्याचे कामही संथ सुरू आहे, याचा यामागे काही संदर्भ आहे का? अशाही वावड्या आहेत. त्याचबरोबर ही जागा महापालिकेला रस्ता विकसन करण्यासाठी वेळोवेळी मागण्यात आली.
परंतु, जागेचा ताबा मालकाने दिला नाही. उलट हा वाद महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात नेण्यात आला. कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सुटू शकली नाही. त्यावरूनही बॅनरबाजी झाली असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
तसेच, नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाली असून तीनचा प्रभाग करण्यात आला आहे. पूर्वी चारचा प्रभाग करून कात्रजचे विभाजन झाले होते. यावेळीही तसेच काही होईल आणि कात्रज विभाजन होऊन विकासाला खीळ बसेल म्हणून हा बॅनर एका कात्रजकराने लावल्याचेही बोलले जात आहे.