मुंबई – कार्तिक आर्यन सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी चर्चेत आहे. सध्या तो आगामी ‘शेहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, त्याच्या आगामी ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटांमध्ये कार्तिक वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. दरम्यान,नुकतंच कार्तिकने खुलासा केला की, त्याला आता कॉमेडी आणि रोमँटिक भूमिका करण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे त्याने काही वेगळे चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कार्तिकला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, जर त्याला शाहरुख खानची कोणतीही एक भूमिका करण्याची संधी मिळाली तर त्याला कोणती भूमिका करायला आवडेल? त्याच्या प्रत्युत्तरात कार्तिकने शाहरुखच्या ‘डर’ चित्रपटातील व्यक्तिरेखा निवडली आणि म्हणाला, “मला वाटते की हे मला यापूर्वीही अनेकांनी सांगितले आहे”.
कार्तिक म्हणाला, “भूल भुलैया 2 च्या शेवटच्या 30 मिनिटांत जेव्हा रूह बाबाचे पात्र बदलते आणि त्यात इतर चित्रपटांच्या तुलनेत खूप गंभीर दृश्ये आहेत, याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी ग्रे भूमिका करू शकतो, असे सांगितले. ग्रे कॅरेक्टर चांगले आहे आणि मी अशा भूमिकांच्या शोधात आहे. आता पुढे काय होते ते बघू, शाहरुख खानचा डर हा एक चांगला चित्रपट आहे आणि माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक असल्याचे देखील कार्तिक आर्यनने यावेळी सांगितले.