नवी दिल्ली – काही हल्लेखोरांनी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे ट्रेनच्या खिडक्यांचे मोठे नुकसान झाल. दक्षिण पश्चिम रेल्वेकडून शनिवारी या घटनेची माहिती देण्यात आली.
म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनवर झालेल्या हल्ल्यामुळे ट्रेनचे दोन खिडक्यांचे नुकसान झाले. ट्रेन कृष्णराजपुरम-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकांदरम्यान पोहोचली तेव्हा काही बदमाशांनी त्यावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या.सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही दगडफेक कोणी केली याचा तपास अधिकारी करत आहेत.ही एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावते. चेन्नई सेंट्रल येथून सकाळी 5:50 वाजता निघते आणि दुपारी 12:30 वाजता म्हैसूरला पोहोचते. दरम्यान, ते बेंगळुरूमधील केएसआर स्टेशनवर थांबते.
या पूर्वी देखील घडल्या आहेत अशा घटना
या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालमधील मालदा येथे हावडाहून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. ही घटना २ जानेवारी रोजी घडली. याच्या एका दिवसानंतर दार्जिलिंगहून आलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना समोर आली आहे. दुसरीकडे, 20 जानेवारीलाही वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती, ही एक्सप्रेस ट्रेन न्यू जलपाईगुडीहून हावडाकडे जात होती. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील उपद्रवी तत्वांनी त्यावर दगडफेक केली होती.
गेल्या काही काळात रेल्वेवर दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहेत. रेल्वे संरक्षण दलाने (RPF) दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागात जानेवारीमध्ये दगडफेकीचे २१ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये १३ गुन्हे नोंदवले आहेत.