सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; कामांचा दर्जा खालावला
कर्जत – वाहनांमुळे रस्त्यावर होणाऱ्या धुळीच्या त्रासाने कर्जत तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्जत शहरासह राशीन, मिरजगाव येथे धुळीचा सर्वाधिक त्रास व्यावसायिक तसेच प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे हा प्रकार घडत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता कार्यालयाच्या अंतर्गत राज्य मार्गाची देखभाल व दुरुस्ती येते.
सध्या कोट्यवधी रुपयांची कामे कर्जत तालुक्यात मंजूर आहेत. मात्र ही कामे अत्यंत धीम्या गतीने होत आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. अनेक कामे मुदतबाह्य झालेली असूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची पाठराखण केली जात आहे. कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या कामांची नेहमीचीच बोंब राहिलेली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रारी करूनही अधिकारी त्याला दाद देत नाहीत.
अमरापूर- बारामती या चौपदरी महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवासी धुळीने माखून निघत आहेत. खेड-करमनवाडी रस्त्यावर माती व खडीचे साम्राज्य पसरले आहे. तेथेही प्रवाशांना धुळीचा मोठा त्रास होत आहे. राशीन आणि मिरजगाव शहरात रस्ते मोठ्या प्रमाणावर उखडल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.
कामे दर्जेदार व्हावीत
तालुक्यात रस्त्याची अनेक कामे निकृष्ट दर्जाची व विलंबाने होत आहेत. कामे भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने झाली तर रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत व धुळीचा त्रास होणार नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. कामे दर्जेदार करा एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.