मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची मुख्यमंत्र्यांना ग्वाही; कराड भेटीचे दिले निमंत्रण
कराड – स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषगांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महानगरपालिकांचे आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नुकताच संवाद साधला. यावेळी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी गत सालच्या स्पर्धेत 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये कराड शहराने प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षीही कराडला देशात प्रथम आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच कराड शहरातील विविध उपक्रम पाहण्यासाठी कराडला येण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कराड नगरपालिकेच्या यावर्षीच्या तयारीची माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर उपस्थित होते. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.
यावेळी बृहन्मुंबई, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद या महापालिकाच्या आयुक्तांनी तसेच लोणावळा व कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांना माहिती देताना कराडमध्ये कचऱ्याचे 100 टक्के संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया, मलनि:स्सारण प्रक्रिया, लोकसहभाग याबाबत माहिती दिली. 2020 सालच्या स्पर्धेसाठी अनेक नगरपालिकांनी चांगली तयारी केली आहे.
कराड नगरपालिकाही जय्यत तयारीने सज्ज असून यावर्षी प्रथम येण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी कराडकरांच्या वतीने दिला. तसेच कराडमध्ये नगरपालिकेने लोकसहभागातून राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी भेट देण्याची विनंतीही केली.
नगरविकास सचिव म्हैसकर यांनी कराड व लोणावळा शहरांची स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरी चांगली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एक टीम म्हणून काम करावे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या. शहरे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये नागरिकांना आनंद देणारी सुंदर उद्याने निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वचजण चांगले काम करत आहेत. मात्र, सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्यक आहे. कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करावा.
यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. तसेच ओला व सुका कचरा शंभर टक्के वेगळा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. अमृतवन योजनेत मोकळ्या जागांवर वन निर्माण करणाऱ्या बार्शी, नवी मुंबई, नाशिक, सांगली, उदगीर, अचलपूर आदी शहरांचे कौतुक केले.