कराड – कृष्णाकाठावरील माणसांसाठी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी 60-70 वर्षांत निर्माण केलेले कृषिप्रधान मॉडेल शेतकर्यांसाठी वरदान ठरले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कृषितज्ज्ञ सतीश खाडे यांनी काढले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू झालेल्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवातील चर्चासत्रात ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, प्रीतिसंगमावरील हे चर्चासत्र हे राज्यासह देशाला दिशा देणारे ठरेल. शेतकरी पिकाच्या हेक्टरी उत्पादनावर आपली प्रगती मोजतो. पाण्याचेही तसेच आहे. भूगर्भातील पाणी आपण संपवले आहे. पूर्वी 20 फुटांवर लागणारे पाणी नंतर 200 फुटांवर आणि आता जवळपास 1600 फुटांपर्यंत खालावले आहे. जमिनीवरील पाणी आपण प्रदूषित केले असून, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आकाशातून पडणारे पाणीही अनिश्चित झाले आहे. जगाची लोकसंख्या तिप्पट झाली असून, पाण्याचा वापर 18 पटींनी वाढला आहे. पिकांची पाण्याची गरज, वातावरण, जमिनीचा पोत, जमिनीखालील खडक यांचा अभ्यास करून पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
बंगळुरूच्या इकोवा कंपनीचे मनोज मेनन म्हणाले, सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून, जीवामृत व बीजामृत तयार करून, शेतकर्यांनी त्याचा वापर करावा. देशात 30 लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आघाडीवर आहेत. पश्चिम महाराष्ट्र ही उसाची राजधानी असली, तरी येथे उसाबरोबर तांदूळ, ज्वारी, बाजरी आदी पिकांचेही चांगले उत्पादन घेतले जाते. विविध पिकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून अशा प्रकारच्या पिकांचे उत्पादन आणि जगभरात निर्यात करणारा भारत हा प्रमुख देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.
ऑस्ट्रेलियाच्या प्लॅन फार्म कंपनीचे एरिक हॉल म्हणाले, जगाला आज सेंद्रिय व शाश्वत शेतीची गरज आहे. आताची माणसाची गरज भागवून, पुढच्या पिढ्यांना सुपीक शेती हस्तांतरित करणे, ही खरी शाश्वतता आहे. सेंद्रिय शेतीमध्ये किती पाण्यावर किती अन्नधान्य उगवता येईल, मातीची सुपिकता कशी टिकवता येईल, नवे तंत्रज्ञान कसे अंमलात आणता येईल, शेती व्यवस्थानाकडे कसे लक्ष देता येईल, ज्यातून पर्यावरण व मातीचे नुकसान होणार नाही, यातूनच शाश्वतता राहील. पर्यावरणीय बदलांनुसार शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
दुसर्या सत्रात चिखली, जि. कोल्हापूर येथील वाय. टी. पाटील डेअरी फार्मचे अरविंद पाटील यांनी ‘दुग्ध व्यवसाय : भविष्यातील नवी दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दुग्ध व्यवसाय हा सर्व वयोगटातील लोकांनी करण्यासारखा आहे. अलीकडे दुग्ध व्यवसाय तोट्यात असल्याचे अनेक जणांचे म्हणणे आहे. मात्र, शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध व्यवस्थापन हा दुग्ध व्यवसायाचा मूलमंत्र आहे. पारंपरिक व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास दुग्ध व्यवसाय शेतकर्यांना शाश्वत समृद्धी मिळवून देऊ शकतो.