-हेमंत देसाई
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपच्या नेत्या इमरती देवी यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना चपराक लगावली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द ठरवला…
सर्वांकडून या गोष्टीचे निषेध झाल्यानंतरही, कमलनाथ आपल्या भूमिकेचे समर्थन करत राहिले. एवढेच नव्हे, तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना त्यांनी “नौटंकी कलाकार’ असे संबोधले. इतरांची निंदानालस्ती करणाऱ्या शब्दांचा वापर हा योग्य नसल्याची समज निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना दिली होती. परंतु त्यांचे डोके ठिकाणावर न आल्यामुळे, निवडणूक आयोगाने आघाडीचे प्रचारक, म्हणजेच स्टार प्रचारक यादीतून त्यांचे नाव हटवले होते.
निवडणूक प्रचारातील स्टार प्रचारकांची यादी प्रत्येक पक्षाला निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. या प्रचारकांचा खर्च पक्षाच्या वतीने केला जातो. अन्यथा तो खर्च उमेदवारांच्या खर्चात जमा होतो. याचा अर्थ, कमलनाथ यांच्या दौऱ्याचा पूर्ण खर्च त्या त्या उमेदवाराला करावा लागला असता. कॉंगेस नेते दिग्विजय सिंग व कमलनाथ यांना “चुन्नू-मुन्नू’ असे संबोधल्याने, भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्याकडूनही आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे आयोगाने जाहीर केले.
याखेरीज विजयवर्गीय यांनी याच दोघांना “गद्दार’ असेही म्हटले होते. विशेष म्हणजे, बिहारमधील जनतेला करोनाची लस विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळे मात्र आचारसंहितेचा भंग होत नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. वास्तविक मतदारांवर प्रभाव टाकला जाईल अशाप्रकारची आश्वासने टाळावीत, अशी आचारसंहितेत तरतूद आहे, तरीदेखील निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वादग्रस्त विधाने केली होती. परंतु त्यावेळीही आयोगाने त्यांना क्लीनचिट दिली होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही मतदान करून बाहेर आल्यानंतर मोदी यांनी माध्यमांसमोर हातात कमळाचे चित्र घेऊन मिरवले होते. हा थेट आचारसंहितेचा भंग होता. पण त्याविरुद्ध काहीच कारवाई झाली नव्हती.
कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती वी. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द ठरवला. त्यामुळे कमलनाथ हे कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राहणार आहेत. निवडणूक आयोगाला एखाद्या पक्षाच्या स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला समाविष्ट करायचे व कोणाला नाही, याचा निर्णय त्या त्या पक्षाने घ्यायचा असतो, आयोगाने नव्हे, असा युक्तिवाद कमलनाथ यांनी केला आहे. अशाप्रकारे यादीतून नाव काढल्यामुळे, खुल्या आणि मोकळ्या वातावरणात निवडणूक होणे, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वावर गदा येत असल्याचे कमलनाथ यांचे म्हणणे आहे. भाजप नेते कमल पटेल यांनी सहा ऑक्टोबर रोजी उज्जैन येथे केलेल्या भाषणात कमलनाथ यांना “विहिरीतला बेडूक’ असे संबोधले होते. तसेच शेतकऱ्यांच्या निधीवर सापाप्रमाणे ते वेटोळे घालून बसले असल्याचेही म्हटले होते. तर 23 ऑक्टोबरला मुरैना येथे केलेल्या भाषणात कमलनाथ हे “रावण’ असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले होते. भाजपला एक न्याय आणि कॉंग्रेसला दुसरा, असे निवडणूक आयोगाने करता कामा नये.
विजयवर्गीय यांच्यावर आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवला असला, तरी त्यांना स्टार प्रचारकाच्या यादीतून काढण्यात आलेले नाही.आजवर आपण महिलांच्या विरोधात कधीही अनुद्गार काढले नाहीत वा त्यांच्याशी गैरवर्तणूक केली नाही. तसेच दुसऱ्याच दिवशी इमरती देवी यांच्या संदर्भात केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली व खुलासाही केला, असा युक्तिवाद कमलनाथ यांनी केला आहे. परंतु तरीदेखील, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेली ती चूक गंभीरच म्हणायला हवी. तसेच राहुल गांधी यांनीही, कमलनाथ यांनी वापरलेली भाषा अयोग्य असल्याची टिप्पणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ म्हणाले होते की, “ते राहुलजींचे मत असेल. तसेच कोणत्या संदर्भात मी हे वक्तव्य केले होते, हे पाहा. कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नसताना, मी माफी कशाला मागू? अर्थात कोणाला आपला अपमान झाला असे वाटले असल्यास मी खेद प्रकट करतो’.
ग्वाल्हेर जिल्ह्यातील डाबरा येथील कॉंग्रेस उमेदवार सुरेश राजे यांच्या निवडणूक प्रचार सभेत कमलनाथ यांचे “ते’ भाषण झाले होते. वास्तविक कमलनाथ यांचे हे उद्गार गैर आहेत. त्यांच्या मनात इमरती देवींबद्दल वाईट भावना नसेलही. परंतु हे शब्द चुकीचेच होते. या संधीचा लगेच फायदा उठवत, शिवराजसिंग चौहान यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहून, कमलनाथ यांना पक्षातील सर्व पदांवरून हाकलून द्यावे, अशी मागणी केली. त्यांच्याकडून हे राजकारण अपेक्षितच होते.
वास्तविक मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनीदेखील आपल्याच पक्षातील स्त्री कार्यकर्त्यांशी गैरवर्तणूक केली होती. अन्य अनेक भाजप कार्यकर्त्यांनी महिलांबद्दल याहून अधिक आक्षेपार्ह विधाने केली होती. परंतु त्याविषयी चौहान यांनी चकार शब्दही काढला नव्हता. मात्र भाजपचे चुकले, म्हणजे कॉंग्रेसचे बरोबर आहे, असे नव्हे. गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारख्यांची परंपरा असणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी अधिक संयमाने व जबाबदारीने वागलेच पाहिजे.अन्यथा “कमळ’ आणि “कमलनाथ’ यांच्यात काही फरक नाही, असेच लोक मानतील.