ऑस्ट्रेलिया सध्या वणव्याने वेढला आहे महाप्रचंड असा वणवा तेथील न्यू साऊथ वेल्स व व्हिक्टोरिया राज्यांत पसरला आहे. एका अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे पन्नास कोटी प्राणी व पक्षी या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. न्यू साऊथ वेल्स राज्यास मोठा फटका बसला असून तेथील फिंडर्स चेस नॅशनल पार्क व कांगारू बेट भागातील चौदा हजार हेक्टर क्षेत्र भस्मसात झाले आहे. आता ऑस्ट्रेलियन वणवे हे जागतिक तापमानातील बदलांचे प्रतीक आहेत असे तेथील शास्त्रज्ञ म्हणतात. तसेच अजैविक इंधन वापरून, जाळून होणारे प्रदूषण आपण आटोक्यात न आणल्यास भविष्यात आणखी भयावह परिस्थिती होईल असा इशारा पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिला आहे.
या आगीमुळे तेथील तापमानातही प्रचंड वाढ झाली असून न्यू साऊथ वेल्स राज्याने गेल्या सव्वाशे वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे. सिडनीत 48 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. मागे अमेरिकेत कॅलिफोर्निया तसेच ब्राझीलमधील ऍमेझॉन जंगल, रशियात सायबेरिया व इंडोनेशियात अशा आगीमुळे मोठा फटका बसला आहे. शास्त्रांच्या अनुसार कोरडी हवा व दीर्घकाल राहिलेला दुष्काळ, वाढते तापमान व जोरदार वाऱ्यांमुळे हे वणवे पेटत आहेत व मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत.
आता याचा परिणाम म्हणून पूर्व आफ्रिकेमध्ये खूप पाऊस तर ऑस्ट्रेलियातील मान्सून मंदावला असून भारतातील मान्सूनवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे जे आपण याच मान्सूनमध्ये पाहिले आहे.
आपण अजैविक व पारंपरिक इंधनाच्या वापरावर तसेच वाहने व कारखान्यांच्या प्रदूषणावर आळा आणला नाही तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे त्याचा प्रत्यय येताना दिसत आहे. आता मोठमोठ्या संपन्न देशांना काही पडले आहे असे वाटत नाही. अमेरिका ही पॅरिस करारातून बाहेर पडली आहे. प्रदूषण नियंत्रण ही आमची जबाबदारी नाही असा जो तो प्रदूषण करणारा देश म्हणत आहे. भारत यामध्ये नेमाने पाठपुरावा करत असून जागतिक एकमत व्हावे असेच भारताचे मत आहे. आता भारताचा अंतर्गत विचार करता दुसरेही वणवे पेटू लागतील असे वाटत आहे. आपण म्हणतो ना की आधी ठिणगी मग त्याचा हळूहळू वणवा होतो. सध्या आपण पाहतो सीएबी व एनआरसीवरून सर्वत्र विरोधक ठिणग्या पाडत असून त्याचा कधी वणवा होईल याचा नेम नाही.
भारत-पाक सरहद्दीवर पाकिस्तान सतत घुसखोरीच्या ठिणग्या पाडत असून त्याचाही वणवा एखादवेळेस होऊ शकतो. ईशान्य भारताची परिस्थितीही याहून वेगळी नाही. आर्थिक क्षेत्रात मंदीमुळे उद्योग बंद पडत चालले आहेत व तेही मंदीच्या ठिणग्या पाडत आहेत. यावर ताबडतोबीने उपाययोजना केली नाही तर अशा मंदीमुळे होऊ घातलेल्या बेकारी व गुन्हेगारीचे वणवे पसरू शकतात. आपण आपल्या देशातील सामाजिक व आर्थिक वातावरणाला वणव्याचा उंबरठ्यावर नेऊन ठेवत आहोत.
अशा परिस्थितीत जागतिक तापमान, ग्रीन हाउस इफेक्ट, ओझोन विरळता व त्यामुळे होणारे अवकाळी पाऊस, पूर, अवर्षण याबाबत जागतिक तर सोडाच देशपातळीवरही आपण काय करणार तेच समजत नाही.आपल्या सामाजिक वातावरणातील प्रकोप वाढत चालला आहे व तो थांबवणे शक्यही आहे.तसे न करता जर आपण आपल्यातच लढत राहू तर निसर्गाचा हळूहळू पावलांनी येणारा महाप्रकोप सर्व जगालाच वेढून टाकणार आहे, त्यात सर्वांचेच नुकसान आहे.
– उत्तम पिंगळे