कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील माले गावच्या तरुण शेतकऱ्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. त्यांनी रयत ऍग्रो संस्थेकडे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रमोद जमदाडे (२५) असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. प्रमोद जमदाडे यांनी रयत ऍग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. मुंबईत झालेल्या आंदोलनातही त्यांचा सह सहभाग होता.
या घटनेमुळे गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच रयत ऍग्रो संस्थेचे प्रमुख सागर सदाभाऊ खोत यांची तातडीने चौकशी करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. सागर सदाभाऊ खोत हे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र आहेत
रयत ऍग्रोच्या कडकनाथ कोंबडी प्रकल्पामध्ये प्रमोद जमदाडे यांनी ५ लाखाची गुंतवणूक केली होती. त्यातील अमिषाच्या जाहिरातीला बरेच शेतकरी बळी पडले आहेत. कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात फसवले गेल्यानंतर प्रमोद जमदाडे यांनी १८ जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते.
त्यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईक, गुंतवणूकदारांनी रुग्णालयात धाव घेतली. रयत ऍग्रो संस्थेचे सागर सदाभाऊ खोत यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.