सातारा – कुठल्यातरी आपल्या जवळच्या बगलबच्च्यांसाठी शासनाचा पैसा खर्च करून महोत्सव साजरा करणे हे योग्य नाही, कास महोत्सव हा लोकप्रतिनिधींनी लोकांसाठी चालू केला आहे की बगलबच्च्यांची घरे भरण्यासाठी. या महोत्सवाच्या संदर्भात आपण स्वतः राज्य शासनाकडे तक्रार करणार आहोत, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “कास महोत्सवाच्या मूळ आयोजनासंदर्भातच शंका घेण्याइतपत जागा आहे. हा महोत्सव खासगी डान्स क्लास चालवणाऱ्यांच्या आग्रहाखातर आहे की लोकप्रतिनिधींच्या, हे समजायलाच मार्ग नाही. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या नावाखाली सरळसरळ पैसा कमावण्याचा धंदा सुरू आहे.’ या महोत्सवाच्या नावाखाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यावर वन विभागाने संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
बगलबच्च्यांची खळगी भरण्यासाठी शासनाचा पैसा वायफळ घालवणे आणि त्याकरता कास महोत्सवाचे त्याला गोंडस नाव देणे हे योग्य आहे का, असा प्रश्न करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने होणाऱ्या तीन दिवसीय कास महोत्सवावर टीकेची झोड उठवली. महोत्सवाचे नियोजन करताना पर्यावरणाचे निकष पाळले जात आहेत की नाही हे पाहणे गरजेचे होते. प्रशासनाने स्वतः महोत्सवाचे आयोजन करून निधीचा योग्य वापर करायला हवा. महोत्सवाच्या नावाखाली पर्यावरणाचे निकष डावलून वृक्षतोड होत असेल तर हे योग्य नाही, वन विभागाने संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या महोत्सवाची आपण राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.