गिरीध: झारखंडमध्ये बाबुलाल मरांडी यांच्या नेतृत्वाखालील झारखंड विकास मोर्चा या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की राज्यातीाल सर्व 81 जागांवर आमचे उमेदवार उभे राहतील.
सन 2019 च्या निवडणुकीत हा पक्ष विरोधी आघाडीत होता. पण त्या आघाडीपासून या पक्षाने आता फारकत घेतली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत येथे कॉंग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांची आघाडी होती. त्यात या पक्षाचाहीं समावेश होता. आज येथे पीटीआयशी बोलताना मरांडी म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी विरोधी आघाडीतील नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आमच्याशी बोलण्यात स्वारस्य दिसले नाही.
त्यामुळे आम्ही आता अधिक वेळ न घालवता स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. आम्ही 5 व 6 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यानंतर पक्षाचे उमेदवार निश्चीत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. झारखंड मधील निवडणुकीची प्रक्रिया 30 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून ती 20 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.