अखिल भारतीय सरपंच संघटनेचे पंतप्रधानांना साकडे
कातरखटाव (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांची नियुक्ती राज्यसभा संसद सदस्यपदी करावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे सरचिटणीस अमोल यलमर यांनी केली आहे.
यलमर यांनी अशा नियुक्तीचे पत्र प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवले असून त्या पत्राची पोचही त्यांना मिळाली आहे. उदयनराजे भोसले हे तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातून विजयी झाले होते. परंतु लोकसभा होतेना – होतेय तोपर्यंत लगेच विधानसभेचा पडघम वाजला आणि महाराष्ट्रात पक्ष बदलाचे वारे घोंगावू लागले. कॉंग्रेस – राष्ट्रवादीमधील मात्तबर नेते भाजपा – शिवसेनेमध्ये प्रवेश करू लागल्यामुळे एकप्रकारे मेघाभरती चालू आहे अशी महाराष्ट्रात चर्चेला ऊत आला होता.
अशातच उदयनराजे भोसले आणि हायकमांड यांच्यात दिल्लीत खलबते झाली आणि उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला राम – राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला व झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते व संघटनाना मोठा धक्का बसला असून अखिल भारतीय सरपंच संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून भावना व्यक्त केली आहे की उदयनराजे भोसले यांना राज्यसभा संसद सदस्यपद देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती, सरचिटणीस यलमर यांनी केली आहे.