महावितरणचे आवाहन : कोणताही धोका न पत्करण्याचे आवाहन
पुणे – पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू वीजवाहक असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे, शेतीपंप, स्विचबोर्ड, पत्र्याची घरे, गोठे येथील वीजअपघात टाळण्यासाठी सावध व सतर्क रहावे. तसेच धोका पत्करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
असे होतात विजेचे अपघात
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. परंतु अनेकदा प्राणांतिक वीज अपघात होतात. विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्विचबोर्ड व वायर्स हाताळणे, पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तूंच्या सहाय्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक प्रकारांमुळे वीज अपघातांचा धोका वाढतो.
अतिवृष्टी, तुटलेल्या वीजतारा, खांब, फीडर पिलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. तुटलेल्या विजेची तार स्वत: हटवण्याचा प्रयत्न करू नये, आवाहन महावितरणने केले आहे.
काय काळजी घ्याल
– स्विचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
– शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्विच तात्काळ बंद करावा.
– टीव्ही डिश किंवा ऍन्टेना वीजतारांपासून दूर ठेवा.
– ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये.
– स्वीचबोर्ड किंवा अन्य उपकरणे पाण्यापासून दूर ठेवा.
– वीज अपघात, तक्रारीसाठी संपर्क
ग्राहक सेवा केंद्र (टोल फ्री)
1912
1800-102-3435
1800-233-3435