वर्षानुवर्षे अल्प आहारावर जगणारे ऋषी-मुनी किंवा अन्नाविना जगणारी काही पात्रे पुराणकथांमध्ये आपल्याला भेटतात. परंतु अन्नाविना खरोखर जगणे शक्य आहे का? या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आगामी काही वर्षांत मिळणे शक्य आहे. आपल्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले पदार्थ हवा, सौरऊर्जा आदी नैसर्गिक घटकांमध्ये उपस्थित असतात आणि वृक्षवेली ज्याप्रमाणे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतात तसेच माणसांचे आणि जनावरांचे अन्न तयार होऊ शकते का, या प्रश्नाचा पाठलाग काही शास्त्रज्ञ करीत आहेत.
ज्याप्रमाणे आपल्या प्राचीन ग्रंथांमधील अनेक कथा आपल्याला आश्चर्यकारक वाटतात आणि आपण त्या खऱ्या मानण्यास नकार देतो, त्याचप्रमाणे विज्ञानातील अनेक शोधही सुरुवातीला अकल्पित आणि अशक्य असेच वाटतात. परंतु एखादा शोध पुढे जेव्हा पूर्णांशाने साकार आणि रूढ होतो तेव्हा आपण चकित होतो. आपल्याकडील मिथकांच्या बाबतीत असेच घडते. जसजशी तांत्रिक विकासामुळे ब्रह्मांडातील रहस्ये उकलत जातात तसतशी मिथकेही खरी ठरत असल्याचे दिसू लागते.
हवा आणि मिथेनच्या साह्याने अन्न तयार करण्याच्या प्रयत्नात आजकाल भारतासमवेत जगभरातील शास्त्रज्ञ गुंतले आहेत. काही शास्त्रज्ञांना या प्रयत्नांत यशही मिळू लागले आहे. वाल्मिकी रामायणातील उल्लेखांनुसार, गौतम ऋषींनी त्यांची पत्नी अहिल्या हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हवेवर जिवंत राहून अदृश्य राहण्याचा शाप दिला होता. केवळ हवा पिऊन जिवंत राहणाऱ्या त्या स्त्रीला अन्य रामायणांमध्ये शिळेची उपमा देण्यात आली आहे. जर अहिल्या शिळा झाली असती, तर सतानंद आणि चिरकारी हे तिचे पुत्र आणि अंजनी ही तिची मुलगी तिची सेवा-शुश्रूषा करीत आहेत, असे वर्णन का केले गेले हा प्रश्न आहेच. अर्थात, आपल्या ऋषी-मुनींना हवेच्या साह्याने अन्न तयार करण्याची कृती केवळ माहीतच होती असे नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत ते असे अन्न सेवनही करीत असत. महाभारतात जेव्हा धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय हे जेव्हा वनात प्रस्थान करतात, तेव्हा तेही हवेचे सेवन करून उपजीविका करतात, असे वर्णन करण्यात आले आहे.
काही विशिष्ट कालावधीसाठी कोणतेही अन्न सेवन न करताही काही लोक जीवित राहतात आणि अशा घटना शास्त्रज्ञांनाही बुचकळ्यात टाकतात. अन्नाविना जगण्याची शक्यता निर्माण व्हावी या दिशेने संशोधन करण्यास शास्त्रज्ञांना या घटना भाग पाडतात. थकल्या अवस्थेत किंवा शोकाकुल असताना प्रत्येक माणसाच्या मनात असा विचार येतो की, स्वयंपाक करण्याची आणि जेवण्याची गरजच पडू नये किंवा अशी एखादी गोळी किंवा औषध तयार व्हावे, जे घेतल्यावर भूकच लागू नये आणि खाण्या-पिण्याची गरजच भासू नये. जगातील शास्त्रज्ञही भूक न लागू देणारी किंवा भूक शमवणारी पौष्टिक गोळी तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही. या प्रयोगासाठी झाडेझुडपे आणि वनस्पतींपासून प्रेरणा घेतली जात आहे, कारण ती निसर्गातील घटकांपासूनच आपल्याला आवश्यक पोषक द्रव्ये सेवन करीत असतात. मग माणसाचे शरीर पंचतत्त्वांपासून थेट आहार का ग्रहण करू शकत नाही, असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडतो. या दृष्टिकोनातून 39 पोषकतत्त्वे असलेले एक चूर्ण शास्त्रज्ञांनी तयार केले आहे; मात्र ते अजूनही फारसे चर्चेत नाही.
आपल्या वेदांमध्ये आणि योगसाधनेत प्राणवायूचा उल्लेख आहे. त्याला “प्राण’ असेही म्हटले गेले आहे. त्या आधारावर शास्त्रज्ञांचा एक समूह असे मानू लागला आहे की, केवळ हवा पिऊन जिवंत राहणे शक्य आहे. सूर्याच्या प्रकाशात उभे राहूनही शरीर जीवनदायी घटक ग्रहण करू शकते. पाश्चात्य देशांमध्ये या क्रियेला “ब्रेथिरियन्स’ असे म्हणतात. प्राणवायू आणि प्रकाशाच्या किरणांनी जीवनदायी घटक ग्रहण करण्यासाठी सर्वप्रथम शाकाहारी असणे आवश्यक आहे. त्यानंतर गाई-म्हशींपासून मिळणारे दूध, दही, तूप, लोणी आदी पदार्थांचे सेवन करणे थांबवायला हवे. त्यानंतर काही दिवसांपर्यंत केवळ द्रवपदार्थांचे सेवन करण्याची सवय लावून घ्यायला हवी. त्यानंतर हवा आणि प्रकाश यांच्या साह्याने जिवंत राहणे शक्य होईल. याच प्रक्रिया आपल्या शरीरावर करून आपले ऋषी-मुनी अनेक वर्षे जिवंत राहत असत. अहिल्या ही ऋषींची पत्नी होती आणि ऋषींची दिनचर्या अत्यल्प भोजन व उपवासावरच आधारित होती. त्यामुळे अहिल्येने शापयुक्त जीवन केवळ हवा पिऊन व्यतीत केले असावे, असे म्हणता येते.
हवा पिऊन जिवंत राहण्यासंदर्भात एक ताजे संशोधन झाले आहे. फिनलॅंडच्या शास्त्रज्ञांनी हवा, पाणी, सूक्ष्म अणू (मायक्रोब्स) आणि ऊर्जा यांचे मिश्रण करून आहार तयार करण्याचे काम केले आहे. हे शास्त्रज्ञ यालाच “भविष्यातील अन्न’ अशी संज्ञा देत आहेत. त्यांचे म्हणणे असे की, जगातील ज्या गरीब देशांमध्ये लोकांना खायला अन्न नाही आणि जनावरांना खायला चारा नाही, अशा देशांत हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. अर्थात या भोजनाची चव सध्या तरी फारशी चांगली नाही. परंतु त्यात मूलभूत प्रथिने आणि खनिजे समाविष्ट आहेत. फिनलॅंडमधील “व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर’ने हे भोजन तयार केले आहे. सेंटरच्या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हवेत असलेले कार्बन डाय ऑक्साइड, पाणी, सूक्ष्म अणू आणि सौर ऊर्जा यांच्या साह्याने भविष्यात माणसाला आपले भोजन तयार करता येईल. त्यासाठी या घटकांचे मिश्रण एका कॉफी कपमध्ये केले जाते. नंतर त्यात वीज प्रवाहित करण्यात येते. तसे केल्यामुळे एक पावडर तयार होते. या पावडरमध्ये 50 टक्के प्रथिने, 25 टक्के कार्बोहायड्रेट आणि उर्वरित अंश फॅट, न्यूक्लिक ऍसिड आदी घटकांचे असतात. अर्थात, माणसाने खाण्यासाठी हे अन्न अद्याप पूर्णांशाने तयार झालेले नाही. परंतु जनावरे हे भोजन निश्चितपणे सेवन करू शकतात. माणसांना खाण्यालायक बनविण्यासाठी या अन्नावर आणखी संशोधन केले जात आहेत. शास्त्रज्ञांनी या अन्नाला “फूड फ्रॉम इलेक्ट्रिसिटी प्रोग्राम’ असे नाव दिले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे रोपटी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या आधारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात तसेच हे अन्न आहे; परंतु त्यासाठी ऊर्जा मात्र दहा पट कमी लागते. या प्रारंभिक संशोधनातून अशी आशा व्यक्त केली जात आहे की, भविष्यात गोरगरीब जनतेला स्वस्त भोजन उपलब्ध करण्याचा हा मार्ग असू शकतो. व्हीव्हीटी टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ जूहा-पेका पिटकानेन यांचे म्हणणे आहे की, आहारासाठी योग्य असलेला सर्व प्रकारचा “कच्चा माल’ हवेत असतो. भविष्यात हे तंत्रज्ञान वापरून वाळवंटी प्रदेशांसह पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त भागांतील लोकांना भोजन उपलब्ध करून देण्यास मदत होईल. “होम रिऍक्टर’ नावाचा एक संभाव्य पर्यायही उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. हे एक प्रकारचे घरगुती उपकरणच असेल आणि त्याच्या साह्याने लोकांना आवश्यक असलेल्या प्रथिनांची निर्मिती करता येऊ शकेल. संशोधनात सहभागी असलेले जैरो अहोला यांच्या मते, या तंत्रज्ञानाच्या मदतीने जनावरांसाठी चाराही तयार करता येऊ शकतो. अशा प्रकारचे अन्न उपलब्ध झाल्यानंतर पिकांच्या उत्पादनाविषयी असलेल्या चिंताही दूर होऊ शकतील.
या पार्श्वभूमीवर, भारतातही बंगळुरूच्या “स्टिंग बायो’ या कंपनीत प्रयोग केले जात आहेत. मिथेनच्या साह्याने प्रोटीन पावडर तयार करण्याचा प्रयत्न या कंपनीकडून केला जात आहे. हा पशूंसाठी एक प्रकारचा चारा असेल. काही कंपन्या ज्वालामुखीतून उत्पन्न झालेल्या सूक्ष्मजीवांच्या साह्याने आहार तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. या सूक्ष्मजीवांवर किण्वन प्रक्रिया करून हॅमबर्गरसारखा नवा आहार तयार करता येऊ शकतो. हवेपासून अन्नपदार्थ तयार करण्याच्या या प्रयत्नांना भविष्यात यश मिळालेच तर मानवजातीचे शेतीवरील अवलंबित्व कमी होईल. परिणामी, हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी होईल. या संशोधनाबद्दल ऐकताना चमत्कारिक वाटत असले आणि त्याच्या सत्यतेबद्दल शंका येत असली, तरी भविष्यात कदाचित हे खरे ठरू शकते.
प्रासंगिक
प्रा. विजया पंडित