निरवांगी, दगडवाडीकरांचा विरोध कायम; शासनाच्या नव्या नियमानुसार भरपाई द्या
निमसाखर -निरवांगी व दगडवाडी (ता. इंदापूर) हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी कळंब – बावडा मार्गासाठी यापूर्वी गेल्या आहेत. तब्बल चार तपानंतरही या दोन गावातील शेतकऱ्यांना आजही मोबदला मिळालेला नाही. शासनाच्या नव्या नियमानुसार नुकसान भरपाई द्या अन्यथा नव्याने होत असलेले काम थांबवू व लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा यावेळी दगडवाडीच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
नीरा नदी काठच्या गावांना दळणवळण सोयीस्कर व्हावे यासाठी बारामती कळंब – बावडा – नरसिंहपूर या रस्त्याचे सन 1972-73 च्या सुमारास काम झाले. हा रस्ता तयार करताना नीरा नदीकाठच्या प्रत्येक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने रस्त्यासाठी अधिग्रहीत केल्या.
त्यावेळी निरवांगी, दगडवाडी भागातील शेतकरी वगळता इतर गावातील शेतकऱ्यांना त्यावेळी बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळाला. काही ठिकाणी वाद झाल्याने शेतकरी न्यायालयामध्ये गेले तो वाद न्यायप्रविष्ठ असल्याने निरवांगी व दगडवाडी हद्दीतील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना रस्ता नुकसानभरपाईची मोबदला मिळाला नाही.त्यानंतर शेतकऱ्यांनी 2001 मध्ये दोन वेगवेगळी आंदोलने केली.
त्या अगोदर मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांसह अन्य मंत्र्यांबरोबरच विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविले होते. या संदर्भात कुठल्याही प्रकारचे उत्तर आले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. तरीही 1975 पासून आजतागायत चार तप होऊन देखील रस्ता नुकसानभरपाईपासून या भागातील शेतकरी वंचित आहे.
या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यासाठी गेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे चालू दराप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आमच्या गाव हद्दीतून रस्ता होऊ देणार नाही. याची प्रशासनाने नोंद घ्यावी याचबरोबर आमच्या मागण्यांसाठी गरज पडल्यास रास्ता रोको व उपोषण करण्याची वेळ जरी आली तरी उपोषण करू, असा इशारा दगडवाडीचे सरपंच बबन रासकर, उपसरपंच सर्जेराव पारेकर, सदस्य कुसुम चव्हाण, किसन पिंगळे, रामदास रासकर, छाया काळे, अनिता वीरकर, अनिता दुधाळ, सविता केसकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शेतकऱ्यांनी वृक्षतोड थांबवली
सध्या या बीकेबीएन रस्त्याचा पालखी महामार्ग असा सर्व्हे झाला असून येत्या काही दिवसांत या रस्त्याचे काम सुरू होईल. गेले काही दिवसांपूर्वी रस्त्याच्याकडेला असणारी झाडे काढण्याचे काम सुरू होते, मात्र दगडवाडी हद्दीमध्ये काम सुरू असताना या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील नुकसानभरपाईसाठी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी या भागातील वृक्षतोड थांबवली आहे.
चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला दया
दगडवाडी ग्रामपंचायतींमध्ये बारामती – कळंब – बावडा – नरसिंहपूर या रस्त्यासाठी दगडवाडी हद्दीतील जमिनींचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. यामुळे पालखी मार्ग विस्तारीकरण योजनेअंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. जोपर्यंत अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनींचा सध्याच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत रस्ता रुंदीकरणास दगडवाडी ग्रामस्थांचा रुंदीकरणास विरोध असलेला ठराव नुकताच करण्यात आला आहे.