सातारा – सातारा शहरात मारामाऱ्या, दुखापत, दमदाटी, शिवीगाळ, जबरी चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता. सौरभ उर्फ लाल्या नितीन सपकाळ (रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे, सातारा), ओंकार रमेश इंगवले (रा. देशमुख कॉलनी, करंजे, सातारा), मंदार हणुमंत चांदणे (रा. गुरूवार पेठ, सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तडीपार युवकांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारामाऱ्या, दुखापत, दमदाटी, शिवीगाळ, जबरी चोरी करून या टोळीने सातारा शहरात दहशत माजवली होती.
त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करूनही त्यांच्या वागण्यात सुधारणा होत नव्हती. पोलिसांनी त्यांना अेनकदा सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्यांच्याकडून गुन्हेगारी कारवाया थांबल्या नसल्याने सातारा शहर पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केल्याचा आदेश काढला.