जेजुरी – पुरंदर तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने कऱ्हा नदीला पूर येऊन जेजुरीचा नाझरे (मल्हार सागर) जलाशय पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. प्रतिसेकंद 85 हजार क्यूसेसने पाणी नाझरे जलाशयातून नदीपात्रात सोडले जात असून कित्येक वर्षांनंतर जलाशयातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत नदी पात्रात सोडले जात असल्याचे सांगण्यात आले.
पुरंदरच्या पूर्व-उत्तर आणि पश्चिम उत्तर बारामती तालुक्याची संजीवनी समजले जाणारे आणि 788 दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असलेले नाझरे (मल्हार सागर) जलाशय सलग दोन दिवस पडलेल्या दमदार पावसाने ओसंडून वाहू लागले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी (दि. 23) 62 सेंमी तसेच मंगळवारी रात्रीच्या सुमारास 65 सेंमी पाऊस पडला. सध्या, 16 हजार क्यूसेसने जलाशयात पाणी येत असून धरणाच्या सर्व दरवाजातून तितक्याच प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे तसेच नाझरे सुपे, मावडी पिंपरी, पांडेश्वर, जवळार्जुन आदी गावांचा मधल्या मार्गे जेजुरीशी संपर्क तुटला आहे, अशी माहिती शाखा अभियंता एस. के.चवलंग यांनी दिली. गेल्या कित्येक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीला पाणी वाहिलेच नसल्याचे आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सांगितले तर जलाशयावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सध्या, जलाशयावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.